नवी दिल्ली – सहा वर्षांपूर्वी केंद्र सरकारने सुरू केलेली प्रधानमंत्री जन-धन योजना यशस्वी झाली असून आता या योजनेंतर्गत उघडलेल्या खात्यांची संख्या 40 कोटींवर गेली आहे. वित्तीय सेवा विभागाने जारी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, यामुळे भारताचा सर्वसमावेशक विकास होण्यास मदत झाली आहे. या खात्याच्या माध्यमातून गरीब लोकांना भारत सरकार थेट मदत करते. या 40 कोटी खात्यामध्ये सध्या 1.50 कोटी रुपये आहेत. हाही एक विक्रम आहे, असे विभागाने म्हटले आहे.
28 ऑगस्ट 2014 मध्ये ही योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेंतर्गत गरीब लोकांना बचत खात्यात रक्कम न ठेवता खाते उघडता येते. या खातेधारकांना रूपे डेबिट कार्ड मिळते. काही प्रमाणात ओवरड्राफ्टची सवलत मिळते. या योजनेंतर्गत उघडलेल्या खातेधारकांना दोन लाख रुपयांपर्यंतचा अपघात विमा मिळतो. आता प्रत्येक सज्ञान व्यक्तींचे बॅंकेत खाते असले पाहिजे, अशी मोहीम सरकारने व बॅंकांनी राबविली आहे. विशेष म्हणजे य्कूण जन-धन खात्यातील निम्मी खाती गरीब महिलांची आहेत.
गरीब महिलांना होत आहे मदत ..
लॉकडाऊनच्या वेळी पंतप्रधानांनी या गरीब महिलांच्या खात्यात दीड हजार रुपये टाकण्याची घोषणा केली होती. सरकारला अडचणीच्या काळात या गरीब महिलांना या खात्यामुळे मदत करता आली गरीब लोकांसाठी ज्या योजना आहेत त्या योजनांतर्गत दिले जात असलेले पैसे या खात्याच्या माध्यमातून दिले जातात. त्यामुळे मध्यस्थांकडून होणारा भ्रष्टाचार संपुष्टात येतो.