खेळाडूंच्या संख्येवर मर्यादा, प्रेक्षकांबाबत होणार निर्णय
मुंबई -आयपीएल प्रशासकीय समितीची उद्या (रविवार) महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. या बैठकीत
स्पर्धेच्या आयोजनाबाबत काही मोठे निर्णय घेण्यात येणार आहेत. त्यात खेळाडूंची संख्या तसेच मैदानावर प्रेक्षकांना परवानगी देण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
अमिरातीत होत असलेली ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अमिराती सरकार व क्रिकेट संघटना बीसीसीआयला तसेच आयपीएल समितीला पूर्ण सहकार्य करेल, असा विश्वास बीसीसीआयने व्यक्त केला आहे. यंदा या स्पर्धेचे 13 वे वर्ष आहे.
मार्च महिन्यापासून करोनाचा धोका जगभरात वाढल्याने ही स्पर्धा अनिश्चित कालावधीसाठी स्थगित करण्यात आली होती. आता अमिरातीत हा धोका अत्यंत अल्प असल्याने या स्पर्धेचे आयोजन होऊ शकते, असा प्रस्ताव खुद्द अमिराती क्रिकेट संघटनेने बीसीसीआयला पाठवला होता. त्यानंतरही काही देशांनी उत्सुकता दर्शवली होती. मात्र, अमिरातीचा प्रस्ताव स्वीकारला गेला व आता येत्या 19 सप्टेंबरपासून ही स्पर्धा सुरू होत आहे.
या स्पर्धेत सहभागी होत असताना गेल्या 12 वर्षांपासून प्रत्येक संघात साधारण 30 ते 35 खेळाडू, सपोर्ट स्टाफ व तांत्रिक अधिकारी असा जवळपास 50 जणांचा ताफा असतो, त्यावर यंदा मर्यादा येणार आहेत. खेळाडूंची संख्या तसेच अन्य व्यक्तींची उपस्थिती धरून केवळ 35 जणांनाच अमिरातीत घेऊन येण्याची परवानगी दिली जाण्याची शक्यता आहे.
प्रेक्षकांना प्रवेश द्यायचा किंवा नाही याबाबत आयपीएल समिती विनंती करू शकते. मात्र, त्याबाबतचा निर्णय अमिराती सरकारच घेऊ शकते. करोनाचा धोका अद्याप संपुष्टात आला नसल्याने हा मुद्दा जनतेच्या व स्पर्धेशी संबंधित व्यक्तींच्या आरोग्याचा असल्याने त्यावर वाद निर्माण होणार नाहीत, असेही बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. स्पर्धेपूर्वी एक महिना सर्व संघातील खेळाडू, अधिकारी तसेच सपोर्ट स्टाफ येथे दाखल होत आहे. 2014 साली देखील स्पर्धा येथेच आयोजित करण्यात आली होती व यशस्वीही झाली होती. यंदाही स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वासही बीसीसीआयने व्यक्त केला आहे.