नवी दिल्ली -पूर्व लडाखमधील सीमेवर चीनबरोबर निर्माण झालेला तणाव इतक्यात दूर होण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे त्या भागात हिवाळ्यातही सज्ज राहण्याचे भारतीय लष्कराने ठरवले आहे. त्यातून सध्या तिथे तैनात असलेले जवान, रणगाडे आणि शस्त्रास्त्रे जैसे थे ठेवण्यात येणार आहेत.
पूर्ण सैन्यमाघारीची तयारी चीनने बऱ्याचदा दर्शवली. प्रत्यक्षात तसे घडले नसल्याची माहिती पुढे येत आहे. त्यामुळे चीनवर दबाव निर्माण करण्याची रणनीती भारताने आखली आहे. पूर्व लडाख हा पर्वतमय भाग आहे. अतिशय उंचावर असल्याने तिथे थंडीची तीव्रता प्रचंड असते.
हिवाळ्यात तेथील तापमान उणे 20 अंशापर्यंत खाली जाते. त्या स्थितीत जवानांची आणि शस्त्रास्त्रांची तैनाती कायम ठेवण्याचे मोठे आव्हान असते. त्यासाठी लागणारी व्यापक तयारी भारतीय लष्कराने आतापासूनच सुरू केली आहे.
हिवाळ्यासाठी लागणारे विशेष कपडे आणि आवश्यक सामग्रीच्या खरेदीसाठी केंद्र सरकारने पाऊल उचलले आहे. भारतीय हवाई दलालाही हाय अलर्टवर ठेवले जाणार आहे. प्रत्यक्ष ताबा रेषेच्या (एलएसी) लगत असणाऱ्या हवाई तळांवर आवश्यक ती सज्जता ठेवली जाणार आहे. त्याशिवाय, भारतीय नौदल हिंद महासागर विभागात दक्ष राहणार आहे.
चीनी कुरापतींमुळे एलएसीलगत मागील काही दिवसांपासून तणावाची स्थिती आहे. ती स्थिती निवळावी यासाठी भारत आणि चीनमध्ये लष्करी आणि राजनैतिक पातळ्यांवर विविध बैठका झाल्या. त्या बैठकांमध्ये पूर्ण सैन्यमाघारीला तयार असल्याचे चीनकडून दाखवण्यात आले.
गलवान खोरे आणि इतर काही भागांतून चीनने सैन्य मागेही घेतले. मात्र, पेंगॉंग त्सोमधील काही भागांतून चीनी सैन्य अजून हटलेले नाही. चीनने पूर्णपणे सैन्य मागे घ्यावे, अशी ठाम भूमिका भारताने घेतली आहे. आता दोन्ही देशांमध्ये लष्करी पातळीवर चर्चेची आणखी एक फेरी लवकरच होण्याची शक्यता आहे.