सातारा -भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे आणि माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी गुरुवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन लक्ष्मणराव इनामदार जिहे कठापूर योजनेचा “पीएमकेएसवाय’मध्ये समावेश करुन 247 कोटींचा निधी दिल्याबद्दल तसेच पंढरपूरकडे जाणाऱ्या पालखी मार्गाचे काम मार्गी लावल्याबद्दल दोघांनी मोदींचे आभार मानले. जिहे कठापूर योजनेच्या जलपूजनाला येण्याचे निमंत्रणही मोदींना देण्यात आले.
आ. गोरे आणि खा. नाईक निंबाळकर यांनी 1 फेब्रुवारी रोजी मोदी यांची भेट घेऊन जिहे कठापूर योजनेच्या रखडलेल्या कामांबाबत सादरीकरण केले होते. य योजनेची उर्वरित कामे त्वरित होण्यासाठी केंद्रच्या प्रधानमंत्री किसान सिंचन योजनेत जिहे कठापूरचा समावेश करण्याची विनंतीही दोघांनी मोदींना केली होती. पंतप्रधानांनीही लगेच जलशक्ती मंत्रालयाला आदेश देऊन केंद्राचा निधी देण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यांच्या आदेशानंतर त्वरित हालचाली होऊन योजनेचा समावेश करण्याबरोबरच 247 कोटींचा निधीही जाहीर करण्यात आला. त्यातील सहा कोटी रुपये वर्गही करण्यात आले. उर्वरित कामे करण्यासाठी सहाशे कोटींपेक्षा अधिक निधीची गरज आहे.
राज्याकडून इतका मोठा निधी उपलब्ध होणे शक्य नसल्याने केंद्राकडून निध मिळविण्यासाठी आ. गोरेंनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली होती. फडणवीसांच्या कार्यकाळात या योजनेच्या पहिल्या टप्प्याची कामे मार्गी लागली होती. जिहे कठापूर योजनेसाठी निधी उपलब्ध केल्याबद्दल खा. निंबाळकर, आ. गोरे, आ. राहुल कुल, आ. सदाभाऊ खोत यांनी मोदींची भेट घेऊन त्यांचे आभार मानले.