कॉंग्रेसने सीईओ झुकेरबर्ग यांना लिहीले पत्र
नवी दिल्ली – फेसबुकने भारतातील निवडणूक राजकारणात हस्तक्षेप केल्याच्या संबंधात जी माहिती उजेडात आली आहे त्या प्रकरणाची कालबद्ध पद्धतीने उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी कॉंग्रेस पक्षाने फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांच्याकडे केली आहे. कॉंग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी हे पत्र लिहीले आहे.
फेसबुकच्या भारतातील टीमने भाजपशी हातमिळवणी करून लोकांवर प्रभाव टाकल्याचा आरोप आहे. त्या अनुषंगाने भारतातील टीमच्या चौकशीचीही मागणी करण्यात आली आहे. तसेच फेसबुकने भारतातील सध्याची टीम बदलून येथे नवीन टीम पाठवण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
फेसबुक मुख्यालयाने, भारतातील आपल्या टीमने जो राजकीय हस्तक्षेप केला आहे त्याची संचालक स्तरावर चौकशी करून त्याचा अहवाल लोकांपुढे सादर केला पाहिजे. महिना-दोन महिन्याच्या अवधीत ही चौकशी पुर्ण झाली पाहिजे अशीही मागणी या पत्रात करण्यात आली आहे. भारतात फेसबुकने भाजला झुकते माप दिल्याचा आरोप अमेरिकेतील एका वृत्तपत्रात करण्यात आला आहे. हा विषय कॉंग्रेसने गांभीर्याने लाऊन धरला आहे.
भारतातील फेसबुक आणि व्हॉटसऍप सारख्या माध्यमांचा उपयोग करून भाजपने खोटा प्रचार केला व लोकांमध्य द्वेष भावना निर्माण करण्याचा प्रयत्न केला असा आरोपही कॉंग्रेसकडून केला जात आहे. सन 2014 पासून फेसबुकवर ज्यांनी ज्यांनी लोकांमध्ये द्वेष भावना निर्माण करणाऱ्या पोस्ट केल्या आहेत त्या सर्व पोस्ट संबंधातहीं फेसबुकने माहिती दिली पाहिजे अशी मागणीही वेणुगोपाल यांनी केली आहे.
जातीय किंवा धार्िर्मक भावना भडकवणारा मजकूर फेसबुकवर प्रसारीत करण्यास या कंपनीचा विरोध आहे. फेसबुकचे तसे जागतिक धोरण आहे. पण भारतात मात्र एका राजकीय पक्षाच्या नेत्यांना अशा पोस्ट करण्यास अनुमती दिली गेली होती. हा प्रकार कसा झाला याची सारी माहिती लोकांपुढे येण्याची गरज वेणुगोपाल यांनी व्यक्त केली आहे.