भारत सरकारच्या प्रयत्नाने 21 जून 2015 रोजी योग दिवस युनोच्या मान्यतेने जागतिक पातळीवर पहिल्यांदा साजरा झाला. दरवर्षी 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिन आता जगभर मोठ्या प्रमाणावर साजरा होत असल्याने या गौरवशाली भारतीय शास्त्राची महती जगाला आता समजली आहे.
करोना महामारीच्या उद्रेकानंतर योगाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर आज सहावा योग दिवस साजरा करण्यात येत आहे. यंदाच्या योग दिनानिमित्त करोना साथीच्या काळात “घरातच योग आणि कुटुंबासह योग’ (योगा ऍट होम अँड योगा वुइथ फॅमिली) अशी थीम आहे. भारतात 21 जून हा वर्षातील सर्वात मोठा दिवस असल्याने या दिवशी योग दिनाची निवड करण्यात आली आहे.
योग प्राचीन भारतीय कलेचे प्रतीक मानले जाते. भारतीय सकारात्मकता आणि उत्साही आयुष्य टिकवण्यासाठी योगास महत्त्वपूर्ण मानतात. सखोल विचार केल्यास योग ही अशी निरंतर प्रक्रिया आहे जी कायिक, वाचिक आणि मानसिक या तीनही पातळ्यांवर स्थैर्य प्रदान करून माणसाला निरोगी ठेवीत सर्वार्थाने समृद्ध करते. सुश्रुतसंहितेत “अनागताबाधा प्रतिषेध’ नावाचा अध्याय आला आहे. अनागताबाधा म्हणजे अद्याप जी आलेली नाहीत अशी दुखणी किंवा आजार.
या अध्यायात दिनचर्येचे सविस्तर वर्णन करून या “अद्याप न आलेल्या’ आजारांना दूर ठेवण्याचा मार्ग दाखवला आहे. “हेयं दुःखम् अनागतम्।’ असे सांगत असतानाच आचार्य पतंजली योगाची आरोग्यविषयक व्याप्ती दाखवतात. निरोगी राहण्यासाठी योग हे आपल्या दैनंदिन जीवनाचे अंग असायला हवे असे सांगताना जितक्या सहजतेने आपण श्वास घेतो तितका सहज योग आपल्यात भिनलेला हवा, असे ते म्हणतात.
आयुर्वेदाप्रमाणेच योगाचीदेखील आठ अंगे आहेत. प्रत्यक्षात ही आठ अंगे नसून मोक्षप्राप्तीच्या दिशेने जाणाऱ्या आठ पायऱ्या आहेत. यम, नियम, आसन आणि प्राणायाम हे बहिरंग योग आपल्या शरीराकडे अधिक लक्ष देतात. तर प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी हे अंतरंग योग मन आणि आत्मा यांच्या पातळीवर कार्य करून साधकाला मोक्षाप्रत पोहोचवतात. आसने आणि प्राणायाम यापुरतेच योगाला मर्यादित ठेवणे हे अयोग्य आहे. भारतीय तत्त्वज्ञानात षड्दर्शनाचे महत्त्व वादातीत आहे. योगाला स्वतंत्र दर्शन म्हणून दिलेली मान्यता मानवी जीवन सर्वार्थाने उच्च प्रतीचे बनवण्यासाठी योगाच्या योगदानाची असलेली साक्षच आहे. एखाद्या हिऱ्याला पैलू पाडल्यावरच तो अनमोल होत असतो. तसे योगशास्त्र मानवी जीवनाला पैलू पाडतो.
– विलास पंढरी