मोहन जोशी.. पुणे शहरात एक वलय असणारं नाव आहे. जवळपास पाच दशके ते राजकारणात सक्रिय आहेत. त्यामुळे सामान्य कार्यकर्त्यापासून बड्या नेत्यांपर्यंत सर्वांचा आमच्या घरी नेहमी राबता असतो! त्यांच्याभोवती असलेली माणसांची गर्दी मी लहानपणापासून अनुभवत आलो; परंतु या राजकीय वलयाचा ना त्यांनी कधी अहंम बाळगला ना आम्हाला त्याचा रुबाब करू दिला. त्यांचा हा साधेपणा आणि सतत कार्यरत राहण्याची ऊर्जाच आमच्यासाठी प्रेरणादायी आहे – रोहित मोहन जोशी
रोहित जोशी आपल्या वडिलांबाबत बोलत असतात. दादांना कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही. कोणी गॉडफादर नाही. तरी राजकारणात त्यांनी आपले वेगळे स्थान निर्माण केले ते राजकारणापेक्षा समाजकारणाला प्राधान्य दिल्यामुळेच! सर्वसामान्य जनतेचे काम करण्यामध्ये त्यांना समाधान वाटते. पक्षकार्य कार्यकर्त्यांच्या जीवावर उभे राहात असते याची दादांना जाणीव असल्याने कुटुंबाच्या सदस्याप्रमाणे ते त्यांची काळजी घेतात. आजच्या काळातही कार्यकर्त्यांसाठी सहज उपलब्ध असलेला नेता अशीच त्यांची प्रतिमा आहे.
कॉंग्रेस पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता म्हणूनच त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे. पुणे शहराच्या विकासाला त्यांनी कायमच प्रथमस्थान दिले आहे. पाणीप्रश्न, वाहतूक समस्या यावर वेळोवेळी आवाज उठवला आहे. पक्षातील वरिष्ठ नेत्यांपासून तरुण कार्यकर्त्यांपर्यंत त्यांचा जनसंपर्क मोठा आहे. त्यांनी दोन वेळा लोकसभेची निवडणूक लढवली. त्यातून त्यांनी पक्षाची ताकद दाखवून दिली आहे.
राजकारणात अनेकवेळा दादांना अन्यायही सहन करावे लागले. पण खचून न जाता त्यांनी धिराने, संयमाने या गोष्टी हाताळल्या! त्यांच्या मिश्किल व संयमी स्वभावामुळे राजकारणातील गुंताही सहजपणे सोडवता आला आहे. नागरी प्रश्नांची त्यांना अचूक जाण आहे. प्रभातमध्ये त्यांनी काही काळ पत्रकार म्हणून कामही केले आहे. राजकारणातील व्यग्रतेमुळे ते आम्हाला पुरेसा वेळ देऊ शकले नाहीत. पण त्यांच्या मृदू स्वभावामुळे घरातील वातावरण कायमच हसत-खेळत राहिलं. वडील-मुलगा असं आमचं नातं न राहता मैत्रीचं नातं निर्माण झालं आहे. त्यांनी कोणताही निर्णय आमच्यावर कधी लादला नाही. अगदी सक्रिय राजकारणात न येण्याच्या माझ्या निर्णयाचाही त्यांनी मान राखला.
कदाचित ही जाण त्यांच्या मनात घट्ट असणाऱ्या धार्मिक अधिष्ठानात असावी. त्यामुळेच इतर राजकारण्यांसारखे व्रतवैकल्यांत दादा अडकल्याचे कधी दिसले नाहीत. पण त्याचवेळी ईश्वराला मला कधीतरी उत्तर द्यायचे आहे, ही भावनाही त्यांच्या मनातून कधीही दूर झाली नाही. मात्र, त्याचवेळी आपली धार्मिक भावना इतरांच्या प्रगतीच्या आणि भावनांच्याही आड येणार नाही, त्याची दादा नेहमीच काळजी घेतात.
राजकारण्याची मुलं म्हणून आम्हाला कधीही स्पेशल वागणूक दादांनी दिली नाही. दहावी झाल्यानंतर मी त्यांच्याकडे टू-व्हिलरचा हट्ट धरला. पण त्यांनी 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर रितसर परवाना काढून गाडी चालवण्याचा सल्ला दिला. नियम सर्वांसाठी सारखेच हेच यातून त्यांनी दाखवून दिले. परवाना काढल्यानंतर त्यांनी स्कूटर व कार असे दोन्ही मला दिले. आजही ते रात्री कितीही उशिरा झोपले तरी सकाळी सहा वाजता ते उठून तयार असतात. दादांमधील हीच ऊर्जा, स्वच्छ व प्रामाणिक स्वभाव हे गुण अनुकरणीय आहेत.
त्यांची ही ऊर्जा प्रवासातून आणि पर्यटनातून मिळत असावी. पर्यटन हे केवळ आनंदच देते असे नव्हे तर आपल्या सामाजिक जाणिवा प्रगल्भ करते, अशी त्यांची भावना असते. केल्याने देशाटन… या उक्तीवर त्यांचा विश्वास आहे. त्यामुळेच ते अनेकदा पर्यटनाला पसंती देतात. या काळात आम्हाला दादा अधिक प्रभावी वाटतात.
समाजाच्या उत्थानासाठी सर्वसमावेशक कॉंग्रेसच्या विचारधारेला पर्याय नाही यावर ते ठाम आहेत. त्यामुळेच पक्षकार्यासाठी दादांनी स्वत:ला वाहून घेतले आहे. कै. गुरुदास कामत यांचा त्यांच्यावर विशेष लोभ. दादा त्यांना पितृस्थानी मानत. त्यांच्या आयुष्यातील प्राधान्यक्रमांमध्ये कुटुंबाचे स्थान या गोष्टीनंतर आहे; पण याचा आम्हाला खेद वाटत नाही तर उलट अभिमानच वाटतो. कारण दादांसारख्या निष्ठावंतांमुळेच पक्षाची विचारसरणी, पक्षाचे कार्य जनसामान्यांपर्यंत पोहोचत आहे!!!