कुणीही उपाशी राहणार नाही याची सरकार काळजी घेत असले तरी आज अनेक कामगार उपाशी राहून दिवस ढकलत असल्याच्या बातम्या येत आहेत. अशा परिस्थितीत आपण सामाजिक बांधिलकी जपून अशा लोकांना मदत करणे गरजेचे आहे.
या देहाकडून देवाकडे जाताना वाटेत “देश’ लागतो, असे उद्गार वि. दा. सावरकर यांनी स्वातंत्र्याप्रती देशबांधवांसाठी काढले होते. त्या काळी ब्रिटिश जुलमी सत्ता देशावर राज्य करीत होती. तिच्या जोखडातून मुक्त व्हायचे असेल तर प्रत्येकांनी त्याग केला पाहिजे. निरर्थक जाण्यापेक्षा काहीतरी या देशाचे आपण देणे लागतो, याची त्यांनी जाणीव करून दिली. तीच वेळ आजची आहे. देशावरच नव्हे तर जगावर करोना संकट राज्य करत आहे. यात भरडला जातोय मानव. त्याला उभारी द्यायची असेल तर सामाजिक दायित्व दाखवण्याची हीच वेळ आहे. हे प्रत्येकाने मनोमन निश्चित केले तर ही मानवी शृंखला अखंडित राहील.
पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरली नसून ती श्रमिकांच्या तळहातावर उभी आहे. श्रमिकांचे महत्त्व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी सांगितले आहे. जगातला सारा भार श्रमिकांनी पेलला आहे. आज करोना आपत्तीच्या पार्श्वभूमीवर जग निर्मितीपासून इतके स्तब्ध कधी झाले नव्हते! या स्तब्धतेत तारेवरची कसरत करून पोट भरणाऱ्या असुरक्षित कामगारांच्या वाट्याला आज उपासमारीची वेळ आली आहे. “हे विश्वची माझे घर’ या संतवचनाने बंधूभाव दाखवण्याची वेळ नव्हे तर संधी आहे. अपेक्षित वर्गाने उपेक्षितांसाठी दायित्व दाखवून मानवी मूल्यांची जपणूक करण्यास एक पाऊल टाकले पाहिजे.
जगात करोनाने हाहाकार माजवला आहे. देशात 20 हजारांपेक्षा जास्त लोकांना करोना व्हायरसची लागण झाली असून सहाशेपेक्षा जास्त जणांनी जगाचा निरोप घेतला तर चार हजारांहून जास्त जण बरे झालेत. जगात 25 लाख 65 हजारांपेक्षा जास्त लोकांना लागण तर 6 लाख 86 हजारांपेक्षा जास्त रुग्ण बरे झालेत तर 1 लाख 77 हजारांपेक्षा जास्त रुग्ण मरण पावले आहेत. महाराष्ट्रात पाच हजारांपेक्षा जास्त लोकांना लागण झाली आहे. मुंबई व पुणे ही दोन शहरे यात आघाडीवर आहेत. अमेरिकेसारखी महासत्ता गुडघे टेकून बसली आहे. जगाची प्रचंड जीवित व वित्तहानी झाल्याने जग काही वर्षे मागे गेले आहे. वाढते लॉकडाऊन आणि जनतेच्या भावना सांधण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. आज आपला संयमच करोनाला हरवणार आहे.
सद्यस्थितीत जगच लॉकडाऊन झालेय त्यामुळे सारे जनजीवन विस्कळीत झाल्याने असुरक्षित कामगार वर्ग उपासमारीच्या विळख्यात अडकला आहे. हा वर्ग गावाकडे जाण्यासाठी आसुसला आहे. इथे किती दिवस थांबायचे त्यापेक्षा गाव बरा, असे त्यांना वाटू लागले आहे. गावाकडेही तीच वेळ आलीय. अशा मजूर श्रमिकाला आता भक्कम आधार देण्याची ही वेळ आहे.
उद्योग नगरीच्या क्षेत्रात पोटापाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी दुष्काळी भागातून, परप्रांतातून आलेला अकुशल, असुरक्षित, असंघटित असलेल्या कामगार वर्गाला कोणतेच काम कायमस्वरूपी मिळत नाही. सरकार सर्वोतोपरी सहकार्य करत आहे. शिवाय स्वयंसेवी संस्था, दानशूर व्यक्तींनीही हातभार लावला आहे. तरीही ज्यांना पोटाची खळगी भरण्यासाठी रोज भटकंती करावी लागते, त्यांचे काय? यावर आता विचार मंथन करून त्यांना या संकटात मदत करायला हवी. भविष्यातील अशा आपत्तीला सामोरे जाताना तळातील वर्गासाठी योजना तयार असली पाहिजे.
लॉकडाऊनमुळे सारेजण सुरक्षितता म्हणून घरीच बसले आहे. आता तर जिल्हे, तालुके, नगर, उपनगर सील होऊ लागली आहेत. हातावर पोट घेऊन मजूर अड्ड्यावर उभे असलेले मजूर, गवंडी, सुतार, प्लंबर, हमाल, बांधकाम मजूर, रंगकाम मजूर, रस्तेबांधकाम मजूर याबरोबर विटभट्टी कामगार, शेतमजूर तसेच पदपथावर गोळ्याबिस्किटे विकणारे, ग्रामीण भागातील कारागीर, वाहन चालक, कंपन्यांतील कंत्राटी कामगार, काच-कागद-पत्रा गोळा करून पोट भरणारा हा असुरक्षित कामगार वर्ग आज आर्थिक ताण सहन करत जगत आहे. छोट्याशा खोलीत किंवा झोपडपट्टीत राहणारे कुटुंब आज बाहेर पडू शकत नाही. गॅस, दूध व मोकळ्या हवेसाठी जीव गुदमरतोय. द्विधा मनस्थिती झाली आहे. आज संकटाला तोंड देत असताना “घामाचा दाम घेणारी’ ही माणसे विवश झाली आहेत.
ऐशोआरामी जीवन जगणाऱ्या परदेशी मंडळींना सर्व सोयी देण्यात आल्या परंतु असुरक्षित वर्गाने याबाबत तोंडातून “ब्र’ही काढला नाही. विंचवासारखे बिऱ्हाड पाठीशी घेऊन परप्रांतीयांनी हजारो मैल आपल्या परिवारासह पायपीट केली आहे. गावाकडे पोहचल्यावर गावची शीवबंदी झाली. त्यांना आधार देण्याऐवजी त्यांचा अवमान केला जात आहे. आपलेच बांधव आहेत ही भावना व जबाबदारी स्वीकारली पाहिजे. त्यांना ठराविक कालावधीसाठी विलग करून पुन्हा समाजात घ्यायला हवे. संकटांपुढे खंबीरपणे उभे राहून मानवी मूल्य जपली पाहिजेत.
शहरातही हीच परिस्थिती आहे. इथेही गजबजलेल्या वस्त्यांमध्ये आज करोनापेक्षा जगण्याची भ्रांत पडली आहे. यात आत्मकेंद्री व राष्ट्राभिमान नसलेल्या मंडळींनी चढ्या भावाने माल विकून पैसा कमवला. शेतकऱ्यांचा निम्मा शेतमाल पडून राहिला. जो माल शहरात पोहचला त्याचा भाव गगनाला गेला. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे! ते राष्ट्रीय संतूलन निर्माण करण्याचे माध्यम आहे. हेच संतुलन राखायचे असेल तर आलेले संकट पेलण्याचे सामर्थ ठेवून बंधूभाव जपला पाहिजे.
– विठ्ठल वळसे पाटील