इस्लामाबाद – पाकिस्तानमधील इंटरनेट सेवा शनिवारी मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली होती. माजी पंतप्रधान आणि तेहरिक ए इन्साफ पक्षाचे प्रमुख इम्रान खान हे सोशल मीडियावरून आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करत असतानाच इंटरनेट सेवा विस्कळीत झाली होती. इंटरनेट सेवा सरकारकडून जाणीवपूर्वक विस्कळीत करण्यात आल्याचा आरोप पीटीआयच्या कार्यकर्त्यांनी केला.
देशातील इंटरनेट जाणीवपूर्वक खंडीत करण्यात आले आहे. हा सरकारचा कट आहे. पाकिस्तानमधील बेकायदेशीर सरकार नागरिकांच्या मूलभूत हक्कांची अजिबात काळजी करत नाही, हाच स्पष्ट संदेश यातून मिळतो आहे, असे पीटीआयने आपल्या निवेदनामध्ये म्हटले आहे.
संपूर्ण देशभरातील इंटरनेट सेवा खंडीत झाली होती, असे नेटब्लॉक्स या इंटरनेट मॉनिटर संस्तेने म्हटले आहे. इंटरनेट खंडीत झाल्यामुळे एक्स, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम आणि यूट्युबसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची सेवाही खंडीत झाली होती.
अशाच प्रकारे दिनांक ७ जानेवारीला पीटीआयच्यावतीने सोशल मीडियावर निधी संकलनाचे आवाहन केले जात होते, तेंव्हाही इंटरनेट खंडीत झाले होते, असेही पीटीआयच्या निवेदनात म्हटले आहे.
मात्र पाकिस्तान टेलिकम्युनिकेशन एथोरिटीने पीटीआयचीही तक्रार अमान्य केली आहे. सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची सेवा अखंडीत सुरू होती. इंटरनेट खंडीत झाल्याची कोणतीही तक्रार मिळाली नसल्याचे प्राधिकरणाने म्हटले आहे.
देशात अस्थिरता निर्माण होण्याचा धोका –
पाकिस्तानमध्ये निष्पक्ष निवडणुकान झाल्यास देशात अस्थिरता निर्माण केली जाऊ शकते, असा इशारा इम्रान खान यांनी दिला आहे. अदियाला तुरुंगातून प्रसार माध्यमांशी अनौपचारिक वार्तालापादरम्यान इम्रान खान यांनी हा इसारा दिला आहे.
पाकिस्तानमध्ये ८ फेब्रुवारीला होणार् या निवडणुकीमध्ये पीटीआयच्या प्रचारामध्ये सरकारकडून मुद्दाम अडथळे आणले जात आहेत, असा आरोपही इम्रान खान यांनी केला.