जालना – मराठा समाजाला आरक्षण असूनही देण्यात आले नाही. आता आरक्षण मिळालेले असूनही सरकार वेळ मागत आहे. सात महिन्यांपासून सरकार वेळच मागत असेल, तर मराठा समाज थांबू शकत नाही. आता आरक्षण घेऊनच आंतरवालीला माघारी परतणार आहे, यापुढे मराठा आरक्षणाचा संघर्ष होऊ नये, म्हणूनच हा लढा आहे, असे मनोज जरांगे-पाटील म्हणाले.
मराठा आरक्षणावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या आवाहनाला दीपक केसरकर यांच्या दाव्याला आणि शंभूराज देसाई यांच्या शक्यतेवर मनोज जरांगे यांनी प्रत्युत्तर दिले आहेत. आतापर्यत सामंजस्याची भूमिका मुख्यमंत्री साहेबांच्या शब्दावर घेतली होती. मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रामाणिकपणे छातीवर हात ठेवल्यास कळेल, त्यांचा सन्मान केल्यामुळे सात महिने वेळ दिला. मुख्यमंत्री अडचणीत येतील अस आमचे काही नाही, असे जरांगे म्हणाले.
जरांगे म्हणाले की, ज्यांच्या ५४ लाख नोंदी मिळल्यात त्यांना आणि त्यांच्या परिवाराला प्रमाणपत्र देण्यात यावे. सगेसोयऱ्यांचा वटहुकूम काढावा. मुंबईला यायची आम्हाला हौस नाही, मुख्यमंत्र्यांनी देखील हे मनातून समजून घेतले पाहिजे. त्यांनी जनभावना समजून घेतल्या पाहिजेत. आम्ही मुंबईला का येत आहोत हे एकनाथ शिंदे समजून घेतले पाहिजे, असेही जरांगे म्हणाले.
मनोज जरांगे यांची मूळ मागणी मान्य झाली असून त्यांनी सांगितल्याप्रमाणे कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्यात आल्याचा दावा मंत्री दीपक केसरकर यांनी केला होता. यावर जरांगे म्हणाले, आपण ५४ लाख प्रमाणपत्र वाटले असतील तर त्याचा आम्हाला डाटा द्या, आम्ही दिलेल्या व्याख्येप्रमाणे सगेसोयरेचा वटहुकूम काढा. मग विचार करतो, असे जरांगे म्हणाले.
आश्वासनावर आंदोलन थांबणार नाही
आमचे दार उघडे आहे, तुम्हीच बंद केले म्हटलात. त्यामुळे बंद तर बंद, खरतर तुम्ही चर्चेसाठी तुटून पडले पाहिजे, पण त्यांनाच काही तोडगा काढायचा नाही असे दिसते. आरक्षणाचा मुद्दा एवढा चिल्लर नाही की, व्हाट्सअप- फेसबुक खेळायला. राज्यातील मोठ्या समुदायाचा मोठा प्रश्न आहे, बारीक लेकरा सारखे तुम्ही करू शकत नाहीत. सरकारच्या विनंतीला नेहमीच मान दिला, मी आढमूठा नाही. तर आता मुंबईकडे निघालो असून, आश्वासनावर हे आंदोलन थांबणार नाही, असे जरांगे म्हणाले.