नगर -भाईसथ्था रात्र प्रशालेतील विद्यार्थी दिवसा कष्ट करून रात्रीच्या शाळेत मेहनतीने व परिश्रमाने शिक्षण घेत आहेत. करोना संकटामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. व्यवसायाला धोका निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत रात्र प्रशालेतील विद्यार्थी शिक्षणापासून वंचीत राहू नये.म्हणून विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेऊन मासूम संस्थेतर्फे किराणा वाटप करण्याचा उपक्रम कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन हिंद सेवा मंडळाचे उपकार्याध्यक्ष तथा भाईसथ्था नाईट हायस्कूलचे अध्यक्ष डॉ.पारस कोठारी यांनी केले.
मुंबई येथील मासूम संस्थेतर्फे हिंद सेवा मंडळाच्या भाईसथ्था रात्र प्रशालेच्या गरजू मुलांना किराणा वाटप करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी शालेय समिती सदस्या सुलभा कुलकर्णी, दादा चौधरी विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय मुदगल, सहायक सचिव बी.यु.कुलकर्णी, प्राचार्य सुनील सुसरे, देविदास खामकर आदी उपस्थित होते.
यावेळी सुलभा कुलकर्णी म्हणाल्या की, शाळेने विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य उपलब्ध करून दिले आहे. तसेच वेळोवेळी सर्व शैक्षणिक मदत दिली जाते. किराणा देऊन कुटुंबाला आधार देण्याचे काम मासूमतर्फे करण्यात आले आहे.