प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 12 -काळाचा वेध घेत आणि नवीन तंत्रज्ञान अवलंब करत आपण पुढे जात आहोत, हे फार महत्वाचे आहे. आजच्या स्पर्धात्मक युगामध्ये टिकायचे असेल, तर माहिती आणि तंत्रज्ञानाची कास धरणे आवश्यक असल्याचे मत सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या 65 व्या वर्धापन दिनानिमित्त प्रमुख ठेवीदार, शेतकरी, उत्कृष्ट कामगिरी केलेले अधिकारी, कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. पणन संचालक सुनील पवार, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे अध्यक्ष दीपक तावरे, सह व्यवस्थापकीय संचालक रमेश शिंगटे, “पीएमआरडीए’चे आयुक्त सुहास दिवसे, नाफेडचे पुनित सिंग, विश्वास भोसले उपस्थित होते.
पवार म्हणाले, भारतात दरवर्षी जवळपास सव्वा लाख कोटींचा आणि महाराष्ट्रात 35-40 हजार कोटींचा भाजीपाला, अन्नधान्य उत्पादन केल्यावर फेकून द्यावे लागते. यासाठी साठवणुकीची व्यवस्था चांगली करणे, शेती स्वस्त करणे, इनपुट खर्च कमी केला तसेच उत्पादन वाढविले तर याचा एकत्रित परिणाम म्हणून शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पट होईल.
महामंडळचे अध्यक्ष दीपक तावरे म्हणाले, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ हे देशातले पाहिले ब्लॉक चेन तंत्रज्ञानाचा वापर करणारे महामंडळ आहे. भविष्यात लॉजिस्टिक्स काळ सुरू होणार आहे. त्याचा विचार करून औरंगाबादमध्ये लॉजिस्टिक्स पार्क उभारणीचे काम सुरू आहे. 2021 मध्ये महामंडळाला 110 कोटींचा नफा झाला.