नारायणगाव -टोमॅटोचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पनाचे पीक समजले जाणारे टोमॅटो पिकाला नारायणगाव उपबाजार केंद्रात सध्या 200 ते 500 रुपयांचा क्रेटला बाजारभाव असल्याने उत्पादक समाधानी आहे. या वर्षीच्या हंगामातील सर्वात चांगला बाजारभाव मिळत असल्याची माहिती सभापती ऍड. संजय काळे, संचालक एन. एम. काळे व विपुल फुलसुंदर यांनी दिली.
यंदाच्या वर्षी करोनामुळे बाजार समिती व शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे. महाराष्ट्रात टोमॅटोचे मुख्य मार्केट म्हणून जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीची ओळख आहे. या उपकेंद्रात सरासरी वार्षिक 200 कोटींची उलाढाल होत असते. बाजार समितीच्या नारायणगाव उपबाजार केंद्रात टोमॅटो, कोथिंबीर, मेथी हे मुख्य भाजीपाल्याची मोठी उलाढाल होते. जुन्नर तालुक्यात प्रामुख्याने टोमॅटो पीक घेतले जाते. हे टोमॅटो भारतातील विविध राज्यांत नारायणगाव मार्केटमधून पाठविले जातात.
मार्चपासून टोमॅटो हंगामाला सुरुवात होते. यंदा करोनाच्या संकटाने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. एप्रिल 2019 पासून ते मार्च 2020 पर्यंत उपबाजार केंद्रातून 4 कोटी 86 लाख 9 हजार 590 टोमॅटो क्रेटची आवक होऊन 173 कोटी 34 लाख 3 हजारची सरासरी आर्थिक उलाढाल झाली होती. या दरम्यान 40 ते 600 रुपयांपर्यंत बाजारभाव होता. कोथिंबीरची एप्रिल 2019 ते मार्च 2020 पर्यंत 45 कोटी 16 लाख 7 हजार 200 जुड्यांची अवाक झाली.
या दरम्यान शेकडा 200 ते 7 हजार रुपये बाजारभाव होता. तर मेथीची 31 कोटी 40 लाख 5 हजार 200 जुड्यांची आवक झाली. या दरम्यान शेकडा 200 ते 3 हजार 800 रुपये बाजारभाव होता. शेपूची 9 कोटी 29 लाख 3 हजार 600 आवक झाली. या दरम्यान शेकडा 200 ते 2 हजार 400 रुपये बाजारभाव होता.
मार्च 2020 लॉकडाऊनमुळे भाजीपाला मुंबई व पुणे येथे वाहतुकीसाठी धोकादायक झाल्याने शेतकऱ्यांचा माल तालुक्याबाहेर जात नसल्याने तो फेकून देण्याची वेळ आली होती. काही शेतकऱ्यांनी उभे पीक सोडून दिले. मागणी नसल्याने तोटा सहन करावा लागला. शेतात आहे तसे सोडून दिल्याने पीक खराब झाले. त्यानंतर 3 एप्रिल पासून टोमॅटोची आवक सुरु झाली आहे. हे टोमॅटो मुंबई, भोपाळ, मध्यप्रदेश, दिल्ली, हरियाणा, राजस्थान आग्रा आदी राज्यात पाठविले जातात.
फेब्रुवारी ते जून या हंगामात जुन्नर, आंबेगाव तालुक्यांत सुमारे 20 हजार एकर क्षेत्रात टोमॅटोची लागवड होते. या टोमॅटो उलाढालीत सुमारे सव्वाशे कोटींची उलाढाल होते; परंतु यंदाच्या वर्षी करोना व निसर्ग चक्री वादळामुळे टोमॅटो हंगामावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला असून, हंगाम वाया गेला आहे.
-ऍड. संजय काळे,
सभापती जुन्नर बाजार समिती