आळंदी -इंद्रायणी नदीवरील जंक्शन पुढील चाकण चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असल्याने वाहनचालकांची तारेवरची कसरत होत आहे. त्यात आणखी भर म्हणजे करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यावेळी हा रस्तावर लोखंडी बॅरिकेट्स लावले होते. ते बॅरिकेट्स आता अस्ताव्यस्त फेकून दिल्याने खड्ड्यांसोबत बॅरिकेट्स पार करणे म्हणजे एक दिव्यच म्हणावे लागेल.
वाय जंक्शन ते चाकण चौक हा सुमारे 500 मीटरचा रस्ता म्हणजे खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा म्हणण्याची वेळ आली आहे. हा रस्ता वादामध्ये आहे की नाही याचा खुलासा सार्वजनिक बांधकाम विभाग व आळंदी नगरपालिका हे नागरिकांना कळू देत नाहीत त्यामुळे या रस्त्याची अतीशय दैयनीय अवस्था झाली आहे. तरी या रस्त्याची त्वरीत दुरुस्ती करावी, अशी मागणी जोर धरीत आहे.
ही पण डोकेदुखी
नवीन फुलाच्या सुरुवातीस पूर्व-पश्चिमेकडे असणारा सबवे मार्गाची देखील दुरवस्था झाले आहे. नदीपात्रात राडारोडा मोठ्या प्रमाणात पडलेला आहे. तसेच इंद्रायणी नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावर वाढलेला जनावरांचा वावर व बंधाऱ्यात मोठ्या प्रमाणात वाढलेली जलपर्णी देखील आळंदीकरांची डोकेदुखी ठरत आहे.