नवी दिल्ली – गेल्या वर्षी महागाईच्या आघाडीवर जेवढी नकारात्मक परिस्थिती होती तेवढी आता राहिलेली नाही. त्यामुळे महागाई उत्तरोत्तर कमी होईल असा अशावाद रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर शतकांत दास यांनी व्यक्त केला आहे. रिझर्व्ह बॅंकेच्या संचालक मंडळाने अर्थसंकल्पातील तरतुदीबाबत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याशी चर्चा केली.
त्यानंतर पत्रकाराशी बोलताना दास म्हणाले की, एकूण परिस्थिती पाहता आगामी आर्थिक वर्षात महागाईचा दर 5.3% च्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर हा महागाईचा दर कमी होईल. कारण जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी होण्याची शक्यता वाढली आहे.
कच्च्या तेलाच्या किमती 95 डॉलर प्रति पिंपापेक्षा जास्त होणार नाहीत असे आम्ही गृहीत धरून पतधोरण तयार केले आहे. जागतिक परिस्थितीवर आपले नियंत्रण नसते. त्यामुळे जर परिस्थिती बिघडली तर त्याचा परिणाम आपल्यावर होऊ शकतो. मात्र परिस्थिती बिघडण्याची शक्यता सध्या कमी दिसत आहे. कारण जागतिक पातळीवर महागाई कमी होत आहे.
विविध देशातील तणाव कमी होत असल्याचे दिसून येत आहे. मात्र अशा परिस्थितीत कच्च्या तेलाची मागणी वाढून तेलाचे दर वाढण्याची शक्यता नकारता येत नाही. त्यामुळे परिस्थितीवर आमचे बारीक लक्ष असल्याचे त्यांनी सांगितले. सहा महिन्यापूर्वी जागतिक मंदी निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात येत होती.
आता परिस्थिती सुधारली असून जागतिक मंदीत जास्त गडद राहणार नाही असे वातावरण निर्माण झाले आहे. अश्या परिस्थितीत जगतीक पुरवठा साखळीवर परिणाम होणार नाही. विदेशी रिझर्व्ह बॅंका व्याजदरात वाढ करणार नाहीत. त्यामुळे निर्यात वाढविण्यास मदत मिळेल.
देशातील भांडवल सुलभता, परदेशातील व्याजदर वाढ, खनिज तेलाच्या किमती, जागतिक पुरवठा साखळी याचा विचार करून महागाई कमी करण्यासाठी काय करावे लागेल याचा विचार केला जातो. नागरिकांना आणि उद्योगांना शक्य तितक्या लवकर कर्ज उपलब्ध व्हावे यासाठी यंत्रणा विकसित करण्यात येत आहे. त्याकरिता संसदेत राष्ट्रीय वित्तीय माहिती रजिस्ट्री संदर्भात एक विधेयक सादर करण्यात आले आहे.