नवी दिल्ली – भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक देश विकसित झाले आहेत. मात्र भारत आतापर्यंत विकसित देश होऊ शकला नाही. अशा परिस्थितीत शक्य तितक्या लवकर भारत विकसित देश व्हावा आणि भारतीय नागरिकांचे दरडोई उत्पन्न वाढावे यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करीत आहे. ही माहिती केंद्रीय माहिती तंत्रज्ञान आणि दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.
वंदे भारत रेल्वेच्या कामकाजाबाबत पत्रकारांशी बोलताना वैष्णव यांनी सांगितले की, शक्य तितक्या लवकर भारत विकसित देश व्हावा अशीच सरकारची इच्छा आहे. त्या दृष्टिकोनातून अनेक आघाडीवर प्रयत्न करण्यात येत आहेत.त्यासाठी मजबूत पायाला जात आहे. त्यामुळे आपल्या पुढच्या पिढीला विकसित देशात राहता येणार आहे.
भारतीय रेल्वेचे आधुनिकीकरण करण्यासाठी वंदे भारत प्रकल्प 2017 मध्ये सुरू करण्यात आला होता. यामध्ये बऱ्याच गुंतागुंती होत्या. मात्र तरीही जानेवारी 2019 मध्ये पहिली वंदे भारत एक्सप्रेस धावली. त्याचा उत्तम अनुभव सर्वांना आला आहे. आता भारत जोखीम स्वीकारणारा देश झाला आहे.
भारतीय मनुष्यबळाचा जास्तीत जास्त रचनात्मक उपयोग करण्यासाठी आपण प्रयत्न करीत आहोत. भारतामध्ये तयार झालेली वंदे भारत रेल्वे जगाच्या दृष्टिकोनातून एक आदर्श ठरत असून इतर देशाचे नागरिक वंदे भारत रेल्वेची पाहणी करीत आहेत. भारतातील रेल्वे आता युरोपातील रेल्वेपेक्षा अधिक दर्जाच्या होत आहेत असे ते म्हणाले.