नवी दिल्ली – महागाई कमी करण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेने मे महिन्यापासून व्याजदरात अडीच टक्के वाढ केली आहे. त्यामुळे घर, वाहन आणि इतर कर्जावरील व्याजदर वाढले आहेत. नागरिक भांडवलाचा वापर कमी करण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे आगामी काळात रिझर्व्ह बॅंकेने व्याजदर वाढ थांबवावी असे आवाहन राज्यसभेचे खासदार विक्रमजीत सिंह सहाय्य यांनी केले आहे.
भारतातील लघु उद्योगांना बॅंकांकडून कर्ज घेऊन भांडवल उभे करावे लागते मात्र रिझर्व्ह बॅंकेने केलेल्या व्याजदरवाढीमुळे लघु उद्योगांना जास्त व्याज दरवाढ व्याजदर द्यावा लागतो. अशा परिस्थितीत त्यांच्या उलाढालीवर आणि कामकाजावर परिणाम होतो. त्याचबरोबर रोजगार निर्मितीवरही परिणाम होत आहे. भारतामध्ये लघुउद्योजक सर्वात जास्त रोजगार निर्मिती करतात. त्यामुळे सर्वसामान्याचा विचार करून रिझर्व्ह बॅंकेने आगामी काळात व्याजदर वाढ टाळावी असे त्यांनी सांगितले.
रिझर्व्ह बॅंकेने गेल्या आठवड्यात व्याजदरात थोडी कमी म्हणजे 0.25% ची वाढ केली आहे. मात्र देशातील आणि प्रदेशातील एकूण परिस्थिती पाहता आगामी काळातही रिझर्व्ह बॅंकेला व्याजदर वाढ करावी लागेल असे रिझर्व्ह बॅंकेने स्पष्ट केले आहे. याच दरवाढीचा लघु उद्योगाबरोबरच दीर्घ पल्ल्याचे कर्ज घेणाऱ्या नागरिकांना त्रास होतो. त्यामध्ये घरावरील कर्जाचा समावेश आहे. आता घरावरील कर्जाचे हप्ते वाढले आहेत किंवा त्याची रक्कम वाढले आहे.
अशा परिस्थितीत मध्यमवर्गाला त्याचा त्रास होत आहे. त्यामुळे घर विक्रीवर आणि निर्मितीवर परिणाम होईल अशी भीती विकसकांचे संघटनेने अगोदरच व्यक्त केली आहे. महागाई कमी करण्यासाठी रिझर्व बॅंक व्याजदरात वाढ करत आहे असे म्हटले जाते. मात्र याला मर्यादा असतात. आवश्यकतेपेक्षा जास्त व्याजदरात वाढ केल्यानंतर त्याचा एकूणच अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम होतो.
दरम्यानच्या काळात रुपयाचे मूल्य कमी झाले आहे. त्यामुळे आयात केलेल्या वस्तू महाग पडत आहेत. त्यामध्ये खत आणि खनिज तेलाचा समावेश आहे. अशा परिस्थितीत सर्वांनी संतुलितपणे विचार करून अर्थव्यवस्थेला पुढे नेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.