मुंबई – बिगर बँकिंग वित्तीय संस्थांच्या म्हणजे एनबीएफसींच्या कार्यप्रणालीत मोठा व्यवस्थात्मक दोष नाही असे स्पष्टीकरण रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी केले आहे. दोन महिन्यात रिझर्व्ह बँकेने दोन मोठ्या एनबीएफसीविरुद्ध कडक कारवाई केली आहे. (No system-wide problem with NBFCs: Das)
त्यामुळे चिंतेचे वातावरण पसरले असतानाच दास यांनी हे स्पष्टीकरण केले आहे. ते म्हणाले की, गेल्या महिन्यात सलग दोन दिवशी दोन एनबीएफसीवर रिझर्व्ह बँकेने कारवाई केल्यानंतर काही जणांनी चिंता व्यक्त केली होती. मात्र आम्ही व्यवस्थेचा आढावा घेत असतो. त्या आधारावर कार्यवाही करीत असतो.
संपूर्ण यंत्रणेतच दोष आहे असे आम्हाला अजिबात वाटत नाही असे त्यांनी स्पष्ट केले. देशाची वित्तीय स्थिती बळकट असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, आम्ही सहजासहजी कोणत्याही कंपनीवर कडक कारवाई करत नाही. फारच मोठा दोष असेल तरच कारवाई केली जाते.