पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – घरगुती सिलिंडरचे दर, महागाई कमी व्हावी. यांसह ईव्हीएम आणि निवडणुकीत पारदर्शकता यावी, अशी अपेक्षा राज्याच्या विविध भागातील महिलांनी व्यक्त केली.
स्त्री आधार केंद्र आणि गरवारे महाविद्यालयाचा पत्रकारिता विभाग यांच्यावतीने राज्यातील विविध जिल्ह्यामध्ये महिला मतदारांच्या राजकीय सक्षमीकरणा संदर्भात सर्व्हे करण्यात आला. मार्चच्या शेवटच्या आढवड्यात घेतलेल्या या सर्व्हेमध्ये १८ ते ७० वयोगटातील महिलांना निवडणुकीसंदर्भात विविध प्रश्न विचारण्यात आले. या संदर्भात स्त्री आधार केंद्राच्या संस्थापक अध्यक्षा व विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी माहिती दिली.
सर्वे घेतलेल्या महिलांपैकी ९३ टक्के महिलांना लोकसभा निवडणुकीसंदर्भात माहिती आहे. रस्ते, पाणी, वीज, रोजगार, महिला मतदारांकडे दुर्लक्ष, स्वच्छतागृहांची समस्या, हुंडा, सुरक्षितता, पुरुषाच्या तुलनेत कमी वेतन, नोकरीमध्ये आरक्षण आदी संदर्भात महिलांनी आपली मते व्यक्त केली.
महिलांना मतदानाचा अधिकार आहे मात्र मत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य नाही. निवडणूक काळात केवळ हळदी कुंकू, पैठणीचे कार्यक्रम राजकीय पक्ष व उमेदवारांनी घेण्यापेक्षा, महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करण्यावर भर द्यावा.
ग्रामीण भागात स्त्री शिक्षण वाढवावे, पुरुषांप्रमाणे स्त्रियांनाही समान वेतन मिळावे, समाजात वावरताना महिलांना सुरक्षितता मिळावी. निवडणुकीत महिला सक्षमीकरण योजना राबवाव्यात, अशा नोंदी महिलांनी केल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. दरम्यान हा सर्वेक्षण अहवाल सर्व प्रमुख पक्ष व उमेदवार यांना देण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.