मुंबई: महागाईमुळे हैराण झालेल्या सर्वसामान्य नागरिकांना सरकारने आणखी एक झटका दिला आहे. सीएनजी आणि पीएनजीमध्ये पुन्हा एकदा भरघोस वाढ करण्यात आली आहे. कारण मुंबई आणि परिसरात सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली आहे. सुधारित दरानुसार सीएनजी प्रति किलो 5 रुपयांनी, तर घरगुती पाईप अर्थात पीएनजी साडेचार रुपयांनी महागला आहे. आज सकाळपासून नवीन दर अंमलात आले आहेत.
महानगर गॅस लिमिटेडने एक निवेदन जारी करुन ही दरवाढ जाहीर केली आहे. या नव्या दरवाढीमुळे सीएनजीचा दर किलोमागे 72 रुपये झाला आहे तर घरगुती पाईप अर्थात पीएनजीचा दर आता किलोमागे 45.50 रुपये इतका झाला आहे. त्या आधी 6 एप्रिल रोजी मुंबईत सीएनजीच्या किमतीत 7 रुपयांची तर पीएनजीच्या किमतीत 5 रुपयांची वाढ करण्यात आली होती.
1 एप्रिलला राज्य सरकारनं नैसर्गिक वायूवरील व्हॅटमध्ये कपात केली होती. मात्र सलग दोन वेळा झालेल्या दरवाढीनं सीएनजी, पीएनजीचे दर पुन्हा एकदा मूळ किमतीवर पोहोचले आहेत. त्यामुळे राज्य सरकारनं केलेल्या व्हॅट कपातीचा ग्राहकांना फायदा झालाच नसल्याचं स्पष्ट झालं आहे. महानगर गॅस लिमिटेच्या या निर्णयामुळे सामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री बसत आहे. मध्यरात्रीपासून नवे दर लागू झाल्याने आज सकाळी घराबाहेर पडलेल्या मुंबईकरांना सीएनजी आणि पाईप्ड कुकिंग गॅसमधील दरवाढ पाहायला मिळेल.
मुंबईसह राज्यभरात आधीच पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. आता सीएनजी आणि पीएनजीच्या वाढलेल्या दरांनी सामान्याचं जगणंच कठीण केलं आहे. तीन लाख खाजगी वाहनांव्यतिरिक्त, शहरात पाच लाख सार्वजनिक वाहतूक वाहनं आहेत, ज्यात रिक्षा, टॅक्सी आणि बस यांचा समावेश आहे, जे नैसर्गिक इंधनावर अवलंबून आहेत. सीएनजीमध्ये झालेल्या दरवाढीचा मोठा फटका टॅक्सी आणि रिक्षाचालकांना बसत आहे. परिणामी टॅक्सी आणि रिक्षाच्या भाड्यात दोन ते पाच रुपयांनी वाढ करण्याची मागणी संघटनेने केली आहे.