श्रीनगर – भारतीय लष्कराने शुक्रवारी जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या घुसखोरीचा डाव उधळून लावला. त्या मोहिमेवेळी जवानांनी एका दहशतवाद्याचा खात्मा केला. त्यामुळे निवडणूक काळात भारतीय हद्दीत घुसण्याचे दहशतवाद्यांचे नापाक मनसुबे उधळले गेले. बारामुल्ला जिल्ह्यातील उरी क्षेत्रात नियंत्रण रेषेच्या (एलओसी) लगत घुसखोरीचा प्रयत्न झाला.
मात्र, सतर्क जवानांनी वेळीच संशयास्पद हालचाली हेरल्या. त्यांनी घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या दहशतवाद्यांना आव्हान दिले. त्यानंतर दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्याला जवानांनी प्रत्युत्तर दिल्याने दोन्ही बाजूंमध्ये चकमक झडली.
त्यामध्ये ठार झालेल्या एका दहशतवाद्याचा मृतदेह घटनास्थळी आढळला. संबंधित ठिकाणावरून जवानांनी २ एके रायफल्स आणि ४ हँड ग्रेनेड जप्त केले.
त्याशिवाय, सुमारे १० हजार रूपये मुल्याचे भारतीय चलनही जप्त करण्यात आले. सध्या लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. त्या प्रक्रियेत अडथळे आणण्यासाठी सीमेपलिकडून दहशतवादी भारतीय हद्दीत घुसखोरी करू शकतात.
त्याची जाणीव असल्याने भारतीय सुरक्षा दले सातत्याने सुरक्षास्थितीचा आढावा घेत आहेत. त्यातून सुरक्षा आणि गस्तही वाढवण्यात आली आहे. त्याचाच परिणाम म्हणून घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावण्यात महत्वाचे यश मिळाल्याचे मानले जात आहे.