नवी दिल्ली – भारताचा ऑफस्पीन गोलंदाज रवीचंद्रन अश्विन करोनातून पूर्ण बरा झाला असून तो कसोटी सामन्यात खेळण्यासाठी इंग्लंडमध्ये दाखलही झाला आहे. इंग्लंडमध्ये असलेल्या भारताच्या कसोटी संघात दाखल झाल्यावर तो शनिवारपासून सरावाला प्रारंभ करणार आहे.
त्याची तंदुरुस्ती सिद्ध झाली असली तरीही त्याची प्रकृती पाहूनच त्याचा येत्या 1 जुलैपासून सुरु होत असलेल्या एकमेव कसोटी सामन्यासाठी संघात समावेश होणार का नाही हे निश्चित केले जाइल.
भारतीय संघ इंग्लंडला रवाना झाला त्यावेळी संघासह अश्विन जाऊ शकला नव्हता. त्याला कोरोनाची बाधा जाल्याने त्याला उपचारांसाठी व त्यानंतर विलगीकरणासाठी रुग्णालयातही पाठवण्यात आले. मात्र, आता तो पूर्ण तंदुरुस्त असल्याचे बीसीसीआयने सांगितले आहे. त्याला थोडा थकवा जाणवत होता त्यामुळे तो सराव सामन्यात खेळू शकलेला नाही.