मुंबई – शिवसेनेच्या आमदारांची संख्या सध्या घटलेली दिसत आहे हे जरी खरे असले तरी बंडखोर आमदार महाविकास आघाडीलाच पाठिंबा देतील महाविकास आघाडीला पाठिंबा असलेल्यांचा आकडा कधीही बदलू शकतो असे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की, बंडखोर आमदार मुंबईत परतल्यावर पक्षाप्रती असलेल्या त्यांच्या निष्ठेची खरी कसोटी लागेल.
आमच्याकडे आवश्यक आकडे असल्याचा दावा बंडखोर गट करत आहे आणि लोकशाही आकड्यांवर चालते. पण आकडे कधीही बदलू शकतात. बंडखोर जेव्हा परततील, तेव्हा त्यांच्या बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेबद्दलच्या निष्ठेची नेमकी परिक्षा होईल असे ते म्हणाले. आता या लढाईला कायदेशीर लढाईचे स्वरूप आले आहे असेही त्यांनी नमूद केले. ते म्हणाले की या पक्रियेसंबंधात काही नियम आहेत आणि सर्वोच्च न्यायालयाचे पुर्वीचे दाखलेही आहेत. अजूनही महाविकास आघाडी एकसंध आहे आणि सरकारच्या चाचणीच्यावेळी बंडखोर आमदारही आम्हाला पाठिंबा देतील.
राऊत यांनी नमूद केले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खात्री आहे की बहुतेक बंडखोर पक्षात परत येतील. बंडखोरांना राज्यपालांना भेटण्यासाठी मुंबईत परत यावे लागेल, त्यानंतर संख्या आणि विश्वासदर्शक ठराव होईल,असे ते म्हणाले.शरद पवार यांना धमकी दिल्याबद्दल राऊत यांनी ट्विटरवरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावरही टीका केली.
अशी भाषा भाजपला मान्य आहे का असा सवाल त्यांनी केला. सरकारे येतील आणि जातील. पण शरद पवारांच्या विरोधात अशी भाषा महाराष्ट्र खपवून घेणार नाही, असं ते म्हणाले.