आळंदी – आषाढी एकादशीच्या दोन दिवस आगोदर मंगळवारी (दि. 27) इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळली असल्याने आळंदीकरांसह भाविकांनी संताप व्यक्त केले आहे.
आषाढी एकादशीनिमित्त जसे पंढरपूर येथे वारकरी भाविकांची गर्दी असते त्याचप्रमाणे एकादशीच्या दिवशी आळंदी येथे हजारो भाविक संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेण्यासाठी येतात. अनेक संतांच्या पालख्यांमधील वारकरी पंढरपूर झाल्यानंतर आळंदी व देहूला येत असतात, त्यामुळे येणारे भाविक पवित्र इंद्रायणी नदीत स्नान करण्यासाठी जात असतात; परंतु येणाऱ्या भाविकांना पुन्हा एकदा केमिकल युक्त फेसाळलेल्या पाण्यातच स्नान करावे लागते आहे.
त्यामुळे वारकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त होण्यासाठी सरकारला लवकरात लवकर बुद्धी द्यावी, अशी प्रार्थना वारकऱ्यांनी माऊलींच्या चरणी केली आहे. इंद्रायणी नदी प्रदूषणाबाबत आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली असून पिंपरी चिंचवडची घाणीचा आळंदीकरांना त्रास होत आहे.
पिंपरी-चिंचवडमधील औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अनधिकृत कंपन्या आहेत. या कंपन्यांमधून प्रक्रिया न केलेले रसायनयुक्त पाणी नदीत सोडले जाते. त्यामुळे नदीत प्रदूषण पसरत आहे. या प्रदुषणामुळे नदीकाठावरील राहणाऱ्या अनेक नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. लवकरात लवकर याबाबत सरकारने लक्ष घालावे, अशी मागणी मोहिते यांनी केली आहे.