आदेश धाब्यावर बसवून करताहेत चोऱ्या,लूटमार; 78 गुन्हेगारांवर कारवाई
अमरसिंह भातलवंडे
पिंपरी – मागील काही दिवसांपासून पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील विविध पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी एकामागोमाग एक कारवाई करीत शहरातील गुन्हेगार आणि चोरट्यांना जेरबंद करीत आहेत. गेल्या काही दिवसांत अनेक मोठ्या चोऱ्या, तसेच लूटमार, मोटारसायकल चोरी प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. धक्कादायक बाब अशी की, जेरबंद आरोपींपैकी काही आरोपींना यापूर्वीच प्रतिबंधात्मक कारवाई करुन शहर व जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. तडीपारीच्या आदेशांना धाब्यावर बसवून गुन्हेगार बिनधास्तपणे शहरातच राहत आहेत. केवळ राहतच नाहीत, तर चोऱ्या आणि लूटमारही करत आहेत.
पिंपरी-चिंचवड पोलिसांनी वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी जानेवारी 2019 ते 30 जून या सहा महिन्याच्या कालावधीत आयुक्तालय हद्दीमधून 78 जणांना जिल्ह्यातून तसेच शहरातून तडीपार करण्याची कारवाई केली आहे. मागच्या वर्षी आयुक्तालय स्थापनेपूर्वी 2018 मध्ये 45 जणांवर अशीच तडीपारीची कारवाई करण्यात आली होती. या आकडेवारीवरून आयुक्तालयाच्या स्थापनेनंतरही शहरात व आयुक्तालय हद्दीमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे, हे दिसून येते. चोरी, लूटमार, जबरी चोऱ्या, वाहनचोरी, खुनाच्या घटना वाढत आहेत.
गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस ठाण्यांव्यतिरिक्त स्थापन करण्यात आलेल्या विविध शाखा आणि पथके गुन्हेगारांचा शोध घेत आहेत. त्याला आता यशही मिळू लागले आहे. त्यामुळे, मागील काही दिवसांत मोटारसायकल चोरीपासून ते लूटमार आणि घरफोड्या आणि चोऱ्यांची उकल पोलिसांनी केली. या गुन्ह्यात जे आरोपी सापडले आहेत. त्यापैकी बहुतांश सराईत असल्याचे निष्पन्न झाले. तसेच हे आरोपी तडीपार असूनही शहर व आयुक्तालयाच्या हद्दीतच राहून गुन्हेगारी करीत असल्याचे उघड झाले.
तडीपार करण्यात आलेले विकास संभाजी तनपुरे, चंद्या उर्फ चंद्रकांत अनंत माने, ससा उर्फ सागर दशरथ वाघमोडे याच्यासह मोका अंतर्गत कारवाई केलेल्या व जामिनीवर सुटलेल्या शाहरुख उर्फ अट्टी रहीम शेख, सराईत व फरार आरोपी विशाल नानासाहेब अव्हाड, लखन उर्फ विकास कैलास सातव , नितीन महावीर चंदनशिवे अशा सराईत आरोपींना विविध गुन्ह्यामध्ये अटक केली आहे. अटक केलेल्या तडीपार गुंडानी जबरी चोऱ्या, घरफोड्या तडीपार असताना केल्याचे उघड झाले. त्यामुळे या तडीपार केलेल्या आरोपींवर पोलीस नजर ठेवण्यात कमी पडत असल्याचे दिसून येते. तडीपारीच्या काळातही आरोपी बिनधास्तपणे शहरात वावरत असताना पोलीस मात्र त्यांच्यापुढे हतबल झाल्याचे दिसून येते.
अशी होते तडीपारीची प्रक्रिया
एखाद्या व्यक्तीकडून किंवा टोळीकडून कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहचू शकते, याची खात्री पटल्यानंतर पोलीस स्टेशन पातळीवर तडीपारींचे प्रस्ताव तयार केले जातात. हे प्रस्ताव नंतर सहाय्यक पोलीस आयुक्तांकडे जातात. याठिकाणी सहाय्यक पोलीस आयुक्त संबंधित गुन्हेगारांविरुद्ध नोटीस प्रसिद्ध करून कारवाई का करू नये, याची विचारणा गुन्हेगाराला करतात. गुन्हेगारांनी आपले स्पष्टीकरण दिल्यास अथवा न दिल्यास हे प्रस्ताव कारवाईसाठी पोलीस उपायुक्तांकडे पाठवले जातात. पोलीस उपायुक्त अधिकारांचा वापर करून पुढील कारवाई करतात. ही प्रक्रिया कधी एका महिन्यात पूर्ण होते, तर कधी पाच वर्षांत. या विरोधात आरोपी कोर्टात दाद मागू शकतात.
सहज येतात शहरात
पिंपरी-चिंचवड शहराचा विचार करता जिल्ह्यातील तडीपारांना सोलापूर, अहमदनगर जिल्ह्यात पाठवण्यात येते. सोलापूर जिल्ह्यातील काही गावे सिमेलगत आहेत. तर अहमदनगर जिल्ह्यातील तालुके अगदीच जवळ आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर केला तरी तडीपारांना शहरात येण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. दळणवळणाच्या सुविधांचा विचार केला तर एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्याच्या अंतिम टोकापर्यंत सहज पोहचता येते. त्यामुळे, तडीपार गुन्हेगारांना शहर व जिल्ह्यात प्रवेश करणे सोपे झाले आहे.
सोप्या पळवाटा
तडीपार गुन्हेगाराला प्रतिबंधात्मक हद्दीमधून अटक केल्यानंतर त्याच्या सुटकेची प्रक्रिया सोपी असल्यामुळे अनेक गुन्हेगार शहरात वास्तव्य करीत असल्याचे दिसून येते. तडीपार गुन्हेगारांना अटक केल्यानंतर कोर्टात हजर करण्यात येते. नातेवाईकांचे आजारपण किंवा इतर काहीतरी स्पष्टीकरण दिल्यानंतर संबंधितांना कोर्ट पुन्हा तडीपार केलेल्या ठिकाणी पाठवते. अनेक वर्षांपासून असेच चित्र पिंपरी-चिंचवड शहरातील तडीपार गुन्हेगारांच्या बाबतीत पहायला मिळत आहे. त्यामुळे, सध्यातरी तडीपार गुन्हेगार शहरात बिनधास्त वास्तव्य तर करीतच आहेत, मात्र सोबत गुन्हेगारीही करीत असल्याचे मागच्या काही घटनेनंतर स्पष्ट झाले आहे.