दहा आणि पाच रुपयांची चलनात असलेली नाणी घेण्यास किराणा दुकानदार, भाजीपाला व्यवसायिक नकार देत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची नाणी कोण स्वीकारणार असा प्रश्न पडला आहे.
रिझर्व्ह बॅंकेने दहा आणि पाच रुपयांची नाणी अद्याप बंद केली नसून चलनात असल्याने नागरिकांनी ती स्वीकारणे गरजेचे आहे. सध्या दहा आणि पाच रुपयांची नाणी बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्याने बाजारामध्ये नाण्यांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट झाला आहे. ग्रामीण भागात शेतकरी वर्ग असल्याने शेतकऱ्यांना चलनामध्ये स्थानिक बॅंक तसेच दूध संस्थांकडून दुधाचा पगार म्हणून दहा आणि पाच रुपयांचे नाणे दिले जात आहे. तरी ही नाणी चलनात असून बंद झाल्याची अफवा बाजारामध्ये पसरल्याने दुकानदार व ग्राहकवर्ग चलनामध्ये असलेली पाच व दहा रुपयांची नाणी एकमेकांकडून घेण्यास टाळाटाळ करीत आहेत.
दूध गवळ्यांना पगार वाटप करण्यासाठी मोठ्या प्रमाणात नाणी दिली जातात. ही नाणी स्वीकारण्याचा दूग्ध व्यवसायिकांना सुद्धा खूप त्रास होत आहे. त्यामुळे पगार स्वरुपात प्रत्येक शेतकऱ्याला दहा आणि पाच रुपयांची दोन ते तीन हजार रुपयांची नाणी द्यावी लागत आहेत. त्यामुळे बाजारांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाण्यांचा साठा उपलब्ध झाला आहे. स्थानिक बॅंकांनी ही नाणी स्वीकारणे गरजेचे आहे. नाणी न स्वीकारल्यास देशद्रोहाचा गुन्हा दाखल होऊ शकतो.