नवी दिल्ली : कोरोना विषाणूंच्या प्रभावामुळे भारतीय पर्यटन व्यवसायाने आंथरूण धरले असून औषध निर्मिती क्षेत्रालाही त्याचा फटका बसला आहे. चीन आणि दक्षिण पूर्व आशियातील पर्यटकांनी आपली बुकींग रद्द केली आहेत. कोरोना बाधीत सापडलेल्या केरळकडे युरोपीय पर्यटकांनी पाठ फिरवली आहे.
भारतात निर्माण होणाऱ्या औषधांचा 70 टक्के कच्चा माला चीनमध्ये तयार होतो. प्रतिजैविके आणि तापशामक औषधांसाठी लागणाऱ्या एपीआय नावाने ओळखल्या जाणाऱ्या रसायनासाठी भारतीय उद्योगसंस्था या बहुतांश चीनमधील उद्योगांवर अवलंबून आहेत. जगात एपीआयच्या किंमती सर्वात कमी चीनमध्ये आहेत. सरकारी पाठींबा असणाऱ्या चीनी कंपन्यांशी स्पर्धा करणे भारतीय कंपन्यांना शक्य झाले नाही. त्यामुळे भारतीय कंपन्यांनी एपीआय उत्पादन बंद केले. त्यामुळे काही प्रतिजैविकांच्या किंमती आत्ताच 15 ते 50 टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्यामुळे निर्मितीसाठी कोणत्याही एका देशावर विसंबून राहू नये, हा धडा मिळाला आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी औषध कंपन्यांच्या प्रतिनिधींशी मंगळवारी चर्चा केली. त्यानंतर त्या म्हणाला, औषधांचा तुटवडा नाही. मात्र औषध कंपन्यांना कोरोना साथीचा मोठा फटका बसला आहे.
औषध क्षेत्राबरोबरच इलेक्ट्रॉनिक क्षेत्राला इलेक्टॉनिक उद्योगाला मोठा फटका बसला आहे. मोबाईल पासून टीव्ही, एसी आणि कम्प्युटर सारख्या उत्पादनांना कच्चा माल आणि तयार माल या दोन्हीसाठी हे क्षेत्र चीनवर अवलंबून आहे. त्यातल्या त्यात एक आशादायी बाब म्हणजे चीनमधील पुरवठादार कंपन्यांनी आपले उत्पादन कमी प्रमाणात का होईना सुरू केले आहे.
“”स्थिती वेगाने सामन्य होत असल्याचे आम्हाला समजले आहे. येत्या दोन आठवड्यात सर्व कर्मचारी कामावर परत येतील असे अनेक कंपन्या सांगत आहेत, असे तंत्रज्ञान कंपनी माईटचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॉर्ज पॉल यांनी सांगितले. ते म्हणाले, भारतीय इलेक्टॉनिक कंपन्यांच्या उत्पादनाचेसहा आठवड्यांचे नुकसान होऊ शकते. चीनी कंपन्या मार्चमध्ये भरात येऊ शकतात.
कोरोना व्हायरसची साथ आटोक्यात ठेवण्यासाठी सुमारे 15 कोटी लोकांना कोंडून ठेवले होते. सार्सची साथ आली होती त्यावेळी 2003मध्ये अशीच स्थिती होत.÷मात्र, त्यावेळी 2003मध्ये चीन ही आंतराष्ट्रीय बाजारपेठेत महत्वाची सत्ता नव्हती. जगात चीनमधील निर्यातीचे प्रमाण 13 टक्के तर आयातीचे प्रमाण 11 टक्के आहे.
जागतिक वाढीला 0.5 टक्के वाढीचा फटका
यावर्षी जागतिक विकास दराला 0.5 टक्के फरक पडेल, असे सरकारी यंत्रणा आणि अर्थतज्ज्ञांचे मत आहे. तर क्रुड तेलाच्या मागणीत तब्बल 30 टक्क्यांनी घट झाली आहे. चीन आता भारतीय उद्योग क्षेत्रात महत्वाची भूमिका बजावत आहे. सूत, लोकर आणि अन्य कच्चा माल भारतातून चीनला निर्यात होतो. कापसाचे उत्पादन यंदा 50 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता असल्याचा अंदाज भारतात वर्तवण्यात येत आहे.
सौर उर्जा क्षेत्रासाठी वाईट बातमी
कोरोनाचा प्रादुर्भाव असणाऱ्या आठ प्रांतात चीन सरकारने काम बंद ठेवले आहे. याच प्रांतात सौर उर्जा क्षेत्रातील महत्वाच्या कंपन्या आहेत. शटडाऊन असणाऱ्या गुआंगडोंग आणि अन्हुई या सारख्या भागात फोटोव्होल्टिक सेल बनवणाऱ्या उत्पादक कंपन्या आहेत. तसेच बंदमुळे चीनच्या वाहतूक क्षेत्रावरही मोठा परिणाम झाला आहे. ट्रक चालकांकडे आरोग्य प्रमाणपत्र अधिकारी मागत असल्याने फारच थोडक्या खेपा होत असल्याचे चित्र आहे.
चीनच्या हवाई उड्डाण क्षेत्रालाही मोठा फटका बसला आहे. सुमारे 80 टक्के फेऱ्या रद्द करण्यात आले आहेत. जपान, तैवान आणि थाई एअरलाईन क्षेत्रावरही मोठा परिणाम झाला आहे. चीनमधील बंदरे जहाज वाहतूक कंपन्या टाळत असल्याने त्या क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे भारतीय शिपींग कंपन्यांना 2020च्या पहिल्या तिमाहीत मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यापासून चीनी बंदरावर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.