पुणे : प्रेम हा विषय सदैव ताजा राहणारा आहे. त्यावर जगातल्या अनेक प्रतिभावंत साहित्यिकांनी अजरामर साहित्य लिहिले आहे. गीतकार, संगीतकार आणि गायकांनी लोकांच्या ओठांवर दशकानुदशके खेळणारी गाणी रचली आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीतील गीतकार व संगीतकारांनी देखील प्रेमाची व्याप्ती आपापल्या शब्दांमधून आणि संगीतामधून रसिकांपर्यंत अप्रतिमरित्या पोहोचवली आहे. अशाच जुन्या-नव्या हिंदी प्रेमगीतांची सुरेल अनुभूती रसिकांनी घेतली.
पूना गेस्ट हाऊस स्नेहमंचच्यावतीने व्हॅलेंटाईन डे निमित्त प्यार से दिल भर दे या हिंदी रोमँटीक गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी संजीव वेलणकर, गायिका मोनाली दुबे, भाई ताह्मणे, दादा जोशी, सतीश मराठे, पूना गेस्टचे किशोर सरपोतदार आदी उपस्थित होते. अजित कुमठेकर, मोहन शेटे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.
कार्यक्रमाची सुरुवात कल्याणजी आनंदजी यांनी संगीतबद्ध केलेले आणि मुकेश यांनी गायलेले चंदन सा बदन, चंचल चितवन… या गीताने झाली. त्यानंतर हिंदी चित्रपट सृष्टीत लोकप्रिय असणारी जोडी अमिताभ आणि जया यांच्या अभिमान चित्रपटातील आज ही तरुणाईला भावणारे अब तो है तुमसे हर खुशी अपनी हे या गीताला रसिकांनी भरभरून दाद दिली.
कार्यक्रमाच्या मध्यंतरात दिल की नजर से, ठहरिये होश में आलूँ तो चले जाइयेगा, प्यार से दिल भर दे , दो कदम तुम चलो, दो कदम हम भी चले, रात अकेली है या गीतांना रसिक प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.कार्यक्रमात डॉ. राजीव जोशी, मंजूषा नरवाडकर, किरण सावंत, संजय मरळ, रामदास गायकवाड यांनी गायन केले. यावेळी अभिषेक खेडकर यांनी निवेदन केले. ध्वनी संयोजन शैलेश धावटे यांचे होते.