क्वालालंपूर – आशियाई करंडक बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पुरुष व महिला संघाचे आव्हान शुक्रवारी संपुष्टात आले. या दोन्ही गटातील खेळाडूंना स्पर्धेची बाद फेरी गाठण्यात अपयश आले आहे. पुरुष संघाला गतविजेत्या इंडोनेशियाकडून 3-2 असा पराभव पत्करावा लागला. तर महिला संघ जपानकडून 4-1 असा पराभूत झाला.
पुरुष संघाने स्पर्धेच्या सलामीच्या लढतीत कोरियाकडून 5-0 असा पराभव पत्करला होता. मात्र, त्यानंतर हॉंगकॉंगवर 3-2 असा विजय मिळवत बाद फेरीची आशा कायम राखली होती. मात्र, आता इंडोनेशियाकडून पराभव झाल्याने त्यांना स्पर्धेबाहेर पडावे लागले.
मानांकित खेळाडू लक्ष्य सेनने सरस कामगिरी केली. मात्र, अन्य खेळाडूंनी साफ निराशा केली. महिला संघालाही यजमान मलेशियाकडून सलामीच्या लढतीत 3-2 असे पराभूत व्हावे लागले तसेच आता जपानकडूनही पराभव झाल्याने त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.