कोलकाता – माजी कर्णधार विराट कोहलीला अखेर सुर गवसला व त्याने अफलातून अर्धशतकी खेळी केली. त्याला सुरेख साथ देत ऋषभ पंतने घणाघाती अर्धशतक फटकावले तर व्यंकटेश अय्यरने आक्रमक 33 धावांची खेळी केली. या कामगिरीच्या जोरावर भारताने वेस्ट इंडिजसमोर दुसऱ्या टी-20 सामन्यात विजयासाठी 187 धावा करण्याचे आव्हान ठेवले.
वेस्ट इंडिजचा कर्णधार कॅरन पोलार्डने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजी देण्याचा निर्णय घेतला. वेस्ट इंडीजचा वेगवान गोलंदाज शेल्डन कॉट्रेलने भारताचा सलामीवीर इशान किशनला बाद करत थाटात प्रारंभ केला. त्यानंतर मात्र, माजी कर्णधार विराट कोहली व विद्यमान कर्णधार रोहित शर्मा या जोडीने संघाचा डाव सावरताना 49 धावांची भागीदारी केली. रोहित चांगला खेळत असताना 19 धावांवर परतला. त्यानंतर मात्र, कोहलीने गिअर बदलला व वेस्ट इंडीजच्या गोलंदाजीवर हल्ला केला. गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेली त्याची अपयशी कामगिरी अकेर संपूष्टात आली व त्याने 41 चेंडूत 7 चौकार आणि 1 षटकार फटकावताना 52 धावांची खेळी केली. मात्र, लगेचच तो रॉस्टन चेसच्या गोलंदाजीवर त्रिफळाबाद झाला. सूर्यकुमार यादवही चेसकडेच झेल देत परतला.
डावाच्या 14 व्या षटकांत संघाचे शतक फलकावर लागले मात्र, भारताने चार फलंदाजा गमावले होते. त्याचवेळी ऋषभ पंत आणि व्यंकटेश अय्यर यांनी आक्रमक फलंदाजी करत संघाला मोठी धावसंख्या ुभारण्यासाठी मोलाची कामगिरी केली. अय्यरही भरात असताना 33 धावांवर बाद झाला. अय्यरने 18 चेंडूत 4 चौकार आणि 1 षटकार फटकावला. दुसरीकडे पंतने आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने 28 चेंडूत 7 चौकार आणि 1 षटकार फटकावताना नाबाद 52 धावांची खेळी केली. भारताने 20 षटकात 5 गडी गमावून 186 धावा केल्या. वेस्ट इंडीजकडून रॉस्टन चेसने 25 धावांत 3 बळी घेतले.
वेस्ट इंडीजला 2017 सालापासून अद्याप भारतीय संघाविरुद्ध टी-20 सामन्यांची मालिका जिंकता आलेली नाही. या तीन सामन्यांच्या मालिकेतही त्यांनी पहिला सामना गमावला असून हा सामना गमावला तर ते तिसरा सामना बाकी असतानाच मालिका गमावणार आहेत. भारताच्या दौऱ्यात अद्याप त्यांना अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आलेली नाही. त्यांनी भारताविरुद्ध सलग तीन एकदिवसीय गमावून मालिकाही गमावली होती तर, पहिला टी-20 सामना गमावल्याने सलग चार पराभव पत्करले आहेत. या मालिकेपूर्वी ते इंग्लंडला टी-20 मालिकेत 3-2 असे पराभूत करून भारतात दाखल झाले होते.
संक्षिप्त धावफलक – भारत – 20 षटकांत 5 बाद 186 धावा. (विराट कोहली 52, व्यंकटेश अय्यर 33, रोहित शर्मा 19, ऋषभ पंत नाबाद 52, हर्षल पटेल नाबाद 1, रॉस्टन चेस 3-25, शेल्डन कोट्रेल 1-20, रोमारीओ शेफर्ड 1-34).