नवी दिल्ली – युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना तातडीने बाहेर काढण्याची योजना व तपशील संबंधितांना त्वरित कळवण्याची सूचना कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी सरकारला केली आहे. सरकार या सुटकेसाठी नेमक्या काय उपाययोजना करीत आहे ही माहिती तेथील लोकांना आणि त्यांच्या भारतातील नातेवाईकांना कळणे गरजेच आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
युक्रेनमधील लष्कराकडून काही विद्यार्थ्यांचा छळ केला जात असल्याची माहिती असून काही जणांनी तशा प्रकारचे व्हिडीओही जारी केले आहेत. त्यातील काही व्हिडीओ राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर हॅंडलवर शेअर केले आहेत. आपल्या मुलांना युक्रेनमध्ये ज्या परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे ते पाहाणे यातनादायी आहे असेही त्यांनी म्हटले आहे.
आपल्या लोकांना असे वाऱ्यावर सोडता येणार नाही. त्यांना बाहेर काढण्यासाठी भारत सरकार नेमक्या काय उपाययोजना करीत आहे याची माहिती त्यांना आणि त्यांच्या नातेवाईकांना कळलीच पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी भारत सरकारने चालढकल केल्याचा आरोप कॉंग्रेसकडून या आधीच करण्यात आला आहे.
अन्य अनेक कॉंग्रेस नेत्यांनीही युक्रेनमधील भारतीय विद्यार्थ्यांचे व्हिडिओ शेअर केले आहेत ज्यात त्यांची दुर्दशा स्पष्ट होते आहे आणि त्यांना लवकरच बाहेर काढण्यासाठी भारत सरकारला अधिक व्यापक प्रयत्न करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली आहे.