मुंबई – आशिया करंडक टी-20 क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाने सावध नव्हे तर त्यांचा नैसर्गिक आक्रमक खेळच केला पाहिजे, असे मत भारतीय संघाचे माजी कसोटीपटू व माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केले आहे.
भारताने टी-20 क्रिकेटमध्ये आक्रमक फलंदाजीच करणे योग्य ठरेल. डावाच्या सुरुवातीला बचावात्मक खेळायचे असते हा कसोटी तसेच एकदिवसीय क्रिकेटचा अलिखित नियम आहे. मात्र, टी-20 क्रिकेटचे निकष भिन्न आहेत. तिथे समोर कोणताही गोलंदाज असो जास्तीत जास्त धावा कशा करता येतील याकडे लक्ष दिले गेले पाहिजे, असेही ते म्हणाले.
विराट कोहली विश्रांतीनंतर तसेच लोकेश राहुल दुखापतीतून सावरत आशिया करंडक स्पर्धेसाठी पुनरागमन करीत आहेत. त्यांनीही संथ फलंदाजी करण्यापेक्षा नैसर्गिक खेळ केला पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.