पाटना – नितीश कुमार यांच्या सरकारवरचा विश्वासदर्शक ठराव आज असताना आज सकाळीच केंद्रीय संस्थांची राष्ट्रीय जनता दलाच्या नेत्यांवर छापेमारी सुरू झाली. त्यावरून या पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी संताप व्यक्त केला.
जेव्हा भारतीय जनता पार्टी घाबरते किंवा एखाद्या राज्यात पराभूत होते तेव्हा हा पक्ष सीबीआय, ईडी आणि इन्कम टॅक्स या आपल्या तीन जावयांना पुढे करतो. जेव्हा मी हनीमूनसाठी परदेशात जातो तेव्हा माझ्या विरोधात लूक आऊट नोटीस काढली जाते. पण नीरज मोदी सारखे धोकेबाज जातात तेव्हा हे काहीच करत नाहीत असे तेजस्वी यादव म्हणाले.
सुशील मोदी यांचे प्रत्युत्तर
तुरूंगात जाणे आणि कोर्टकचेऱ्या करणे हा तर लालूप्रसाद यांच्या कुटुंबाचा विशेष गुण आहे अशी टीका भाजपचे नेते सुशील मोदी यांनी केली आहे. ज्या लोकांवर आज छापे पडले आहेत त्यांच्यावर काही पहिल्यांदा हे छापे पडलेले नाहीत. दोन महिन्यांपूर्वी नोकरीच्या बदल्यात जमीन घोटाळा प्रकरणात भोला यादव यांना अटक करण्यात आली होती.
लालूंच्या कुटुंबाला तर या छाप्यांचा अभ्यास आहे. गेल्या 15 वर्षांत 50 वेळा त्यांच्यावर छापे पडले आहेत. तुरूंगात जाणे आणि कोर्टात जाणे त्यांच्यासाठी काही अडचणीचे नाही. त्यामुळे सीबीआयने आमच्या घराशेजारी कार्यालय उघडावे असे त्यांचे नेते म्हणत आहेत.