पुणे: भारतीय रेल्वे यंत्रणेकडून कोरोनाचा सामना करण्यासाठी सातत्याने 24 तास युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत. मध्य रेल्वेच्या मुंबई, पुणे, नागपूर, भुसावळ, सोलापूर या विभागांमध्ये अत्यावश्यक सोयी पुरवण्यासाठी विविध पथके नेमली आली असून, कर्मचार्यांच्या सुरक्षिततेसाठी विशेष खबरदारी घेण्यात येत असल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली.
पुणे विभागातील गार्ड विशाल काळगे यांनी 1200 मास्कची निर्मिती केली आहे. घरी तयार केलेले हे मास्क निर्जंतुक करून वितरित करण्यात येणार आहेत. करोनाच्या पार्श्वभूमीवर मालधक्के (गुडस शेड), साईडिंगबाबत विशेष खबरदारी बाळगण्यात येत आहे. गुरु मार्केट, कोल्हापूर, मिरज आणि भिलवडी येथे देखील अन्नधान्ये आणि गॅसचे रॅक ‘लोड’ (साहित्य चढवणे) करण्यात येत आहेत.
यासह विभागातील रॅक ‘अनलोडिंग’ करणार्या (साहित्य उतरवणार्या) कामगारांच्या सुरक्षिततेसाठी प्रयत्न करण्यात येत असून, कर्मचार्यांमध्ये विशिष्ठ अंतर ठेवण्यात येत आहे. यासह कर्मचार्यांसाठी मास्क, सेनीटायझर आदीसह हात धुण्याची व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आली आहे. काम सुरू होण्यापूर्वी कर्मचार्यांच्या शरीरातील तापमानाची तपासणी करण्यात येत असल्याचे पुणे विभागाचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांनी संगितले.
मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील डॉक्टर, कर्मचार्यांना सुरक्षा उपकरण तयार करणे, करोनाच्या संशयितांना विलगीकरण कक्षामध्ये दाखल करण्याबाबत प्रशिक्षण देण्यात येत आहे. मुंबई विभागांतून रद्द झालेल्या रेल्वे, आरक्षण परतावा आदीबाबतचे 15 लाख संदेश प्रवाशांना पाठवले आहेत. तर 26 मार्च रोजी 16.45 मॅट्रिक टन साहित्य चढवले आहे. भुसावळ विभागातून शेती आणि पेट्रोलियमसंबंधीच्या साहित्याची वाहतूक करण्यात येत आहे. नागपूर विभाग आणि सामाजिक संस्थेच्या सहाय्याने नागपूर रेल्वे स्टेशनच्या रेल्वे सहाय्यकांना 50 हून अधिक अत्यावश्यक सेवांच्या किटचे वितरण केले असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.