नवी दिल्ली – संपूर्ण जगामध्ये हाहाकार माजविणाऱ्या कोरोना विषाणूने भारतामध्ये देखील आपले पाय मजबूत करण्यास सुरुवात केली असून या विषाणूला वेळीच रोखण्यासाठी भारतीय नागरिक देखील सजग झाले आहेत. कोरोनाला अटकाव करण्यासाठी केंद्र सरकारतर्फे कठोर पावले उचलण्यात आलीयेत. याचाच एक भाग म्हणून देशभरामध्ये 21 दिवसांचा लॉक डाऊन घोषित करण्यात आलाय. दरम्यान, देशातील लॉक डाऊन दरम्यान हातावर पोट असलेल्यांची उपासमार होऊ नये यासाठी विविध संघटना पुढे येताना दिसत आहेत.
अशातच आज भारतीय जनता पक्षातर्फे आपल्या देशभरातील कार्यकर्त्यांना दररोज अन्नाची पाच पाकीट गरजूंना वाटण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या मोहिमेची सुरुवात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी आज पासून केली असून त्यांनी अन्नाची दहा पाकीट पोलीसांकडे सुपूर्द करत ती गरजूंना वितरित करण्यात यावीत अशी विनंती केली.
याबाबत बोलताना नड्डा यांनी, ‘देशातील भाजपचे एक कोटी कार्यकर्ते उद्यापासून प्रत्येकी अन्नाची पाच पाकीट गरजूंना वितरीत करतील’ अशी माहिती दिली.