Afghanistan Crisis – तालिबान्यांनी अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर येथे अराजक माजले आहे. हजारो लोक तालिबानच्या कचाट्यातून स्वतःला वाचवण्यासाठी देशातून पलायन करत आहेत. अफगाणिस्तानातील या सशस्त्र सत्तांतरानंतर भारताने देखील सावध भूमिका घेतली असून येथील भारतीय दूतावासातील कर्मचाऱ्यांना सुखरूप मायदेशी आणण्यात आले आहे. अफगाणिस्तानात अराजकता माजली असताना भारतीय दूतावासातील कर्मचाऱ्यांचे भारतीय हवाईदलाने केलेल्या रेस्क्यू ऑपरेशनबाबतची माहिती समोर आली आहे.
-
भारतीय हवाई दलाच्या सी-१७ ग्लोब मास्टर विमानांनी अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीय दूतावासातील कर्मचारी व नागरिकांची सुटका केली आहे. रविवारी १५ ऑगस्टच्या पहाटे पहिल्या विमानाने तर सोमवारी दुसऱ्या विमानाने काबूलसाठी उड्डाण घेतले होते.
-
१५ व १६ ऑगस्ट दरम्यानच्या रात्रीत अफगाणिस्तानातील परिस्थिती अत्यंत बिघडली होती.
-
तालिबानने अति सुरक्षेच्या ‘ग्रीन झोन’चे उल्लंघन करत भारतीय दूतावासावर नजर ठेवण्यास सुरुवात केली होती. Afghanistan Crisis
-
अशा परिस्थितीमध्ये भारतीय दूतावासातील कर्मचारी व दूतावासाची सुरक्षा करण्यासाठी तैनात असलेल्या आयटीबीपीच्या जवानांचे रेस्क्यू ऑपरेशन अशक्यप्राय होते.
-
अफगाणिस्तानातून भारतात येणाऱ्यांना व्हिसा देण्याचं काम करणाऱ्या ‘साहिर वीजा’ कार्यालयावर तालिबानी दहशतवाद्यांची छापेमारी
-
अफगाणिस्तानातून भारतीय दूतावासातील कर्मचाऱ्यांना पहिल्या विमानाने मायदेशी परत आणण्यात आलं, त्यांना तालिबानी दहशतवाद्यांनी विमानतळाकडे जात असताना रस्त्यात अडवल्याचं सूत्र सांगतात. यावेळी काही कर्मचाऱ्यांकडून त्यांचे साहित्य हिसकावण्यात आल्याचेही कळते.
-
सोमवारी पहिले विमान दूतावासातील कर्मचारी व काही भारतीय नागरिक अशा ४५ जणांना घेऊन नवी दिल्ली येथे दाखल झालं.
-
याचदरम्यान अफगाणिस्तानातून बाहेर पडण्यासाठी हजारो नागरिक विमानतळाकडे निघाले होते. यामुळे रस्त्यावर प्रचंड गर्दी व गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. Afghanistan Crisis
-
यामुळे सोमवारी दूतावासातील काही कर्मचारी, आयटीबीपी जवान व येथे अडकलेल्या नागरिकांना रेस्क्यू करणे शक्य झाले नाही.
-
तेथील स्थितीवर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि अन्य वरीष्ठ अधिकाऱ्यांचे सातत्याने लक्ष ठेवुन होते.
-
अशातच दूतावासातील काही कर्मचारी, आयटीबीपी जवान व येथे अडकलेल्या नागरिक यांना काबुल येथील विमानतळावर पोहचवण्यात भारताला यश आले.
-
या १२० नागरिकांना घेऊन भारतीय हवाई दलाच्या सी-१७ ग्लोब मास्टर या दुसऱ्या विमानाने पहाटे सहा वाजता काबुल येथून उड्डाण घेतले.
-
हे विमान सकाळी ११ वाजता गुजरातेतील जामनगर विमानतळावर उतरले.