काबुल – अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर तालिबानने देशभर कर्जमाफी जाहीर करून टाकली आहे. तसेच देशभरातील महिलांना सरकारमध्ये सामील होण्याचे आवाहन देखील केले आहे.
तालिबान्यांची होती भारतीय दूतावासावर नजर; भारतीय हवाईदलाने केलं ‘थरारक’ रेस्क्यू ऑपरेशन
देशभरात निर्माण झालेला तणाव शांत करण्याचा हा प्रयत्न आहे. तालिबानच्या सांस्कृतिक आयोगाचा सदस्य असलेल्या इनामुल्लाह समानगनी याने ही माहिती दिली. देशातील प्रांतीय पातळीवरील प्रशासनाच्या बाबतीत तालिबानकडून करण्यात आलेले हे पहिले वक्तव्य आहे.
तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवताच तब्बल ५ हजार दहशतवाद्यांची केली तुरुंगातून सुटका; पहा व्हिडीओ
तालिबानने देशावर नियंत्रण मिळवल्यानंतर काल दिवसभर काबुल शहरात जाळपोळ आणि हिंसाचाराच्या घटना घडत राहिल्या. तालिबानने तुरुंग खुले करून कैद्यांना सोडून दिले आणि शस्त्रगारही लुटले गेले. पूर्वीच्या तालिबानी राजवटीत क्रौर्याची परिसीमा झालेली होती, याची आठवण यामुळे काबुलच्या रहिवाशांना झाली.
यावेळी मात्र महिलांप्रती तालिबानची भूमिका सौम्य झाली आहे. आता महिलांना सरकारमध्ये सहभागी करून घेतले जाईल, असे समानगनी याने सांगितले. अफगाणिस्तानच्या नवीन सरकारचे स्वरुप नक्की कसे असेल हे अद्याप निश्चित नाही. मात्र सरकारमध्ये पूर्ण इस्लामी नेते असतील आणि सरकारमध्ये सर्व गटांनी सहभागी व्हावे. आमचे लोक मुसलमान आहेत आणि आम्ही त्यांना इस्लामची सक्ती करायला इथे आलो नाही, असेही त्याने सांगितले. मात्र सरकारचा तपशील त्याने जाहीर केला नाही.