गोपनीय माहिती पुरवणाऱ्या 23 वर्षीय भारतीय युवकाला वाराणसीतून अटक
नवी दिल्ली : पाकिस्तानी मुलीच्या प्रेमात पडून आयएसआयचा हस्तक बनून देशाची संवेदनशील माहिती पाकिस्तानला देणाऱ्या युवकाला रविवारी उत्तर प्रदेश दहशतवाद प्रतिबंधात्मक पथकाने (एटीएस) अटक केली.
महंमद रशीद असे या युवकाचे नाव आहे, रशीद वाराणसीत आयएसआयसाठी काम करत असे. 29019 पासून तो पाकिस्तान गोपनीय माहिती पाठवत असे. त्याला त्याच्या स्मार्टफोनसह ताब्यात घेण्यात आले. त्याच्या फोनमध्ये लष्करी संस्थांची आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या तळाची छायायचित्रे आढळून आली. हे व्हिडिओ आणि माहिती पाठवल्याबद्दल त्याला पैसे आणि भेटवस्तू मिळत असत. त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे, असे एटीएसच्या निवेदनात म्हटले आहे.
त्याने भारतात किती ठिकाणी भेट दिली आणि छायाचित्रे काढली, याची माहिती त्याच्याकडून घेण्यात येत आहे. त्याला किती पैसे अथवा भेटवस्तू मिळाले, या गुन्ह्यात आणखी कोण सहभागी आहे, याची चौकशी करण्यात येत आहे, असे सूत्रांनी सांगितले.
कसा बनला आयएसआय एजंट
महंमद रशीद हा त्याच्या आजोळी वाराणसीत मामाच्या घरी राहतो. त्याचे आईवडील मोहमंद आणि शेहजादी बेगम यांचा घटस्फोट होऊन त्यांनी पुन्हा दुसरे लग्न केले आहे. आठवी शिकलेला रशीद टेलरिंग आणि मेडिकल दुकानामध्ये काम करत असे. त्यानंतर त्याने साईन बोर्ड बसवून देण्याचा व्यवसाय सुरू केला. रशीदचे नातेवाईक कराचीत राहतात. त्याच्या अत्याला भेटण्यासाठी आणि लग्न सांरंभासाठी तो 2017 आणि 2018-19 अशा दोनवेळा पाकिस्तानात जाऊन आलेला आहे. त्याची आत्या हसीना, त्याचा नवारा शागीर अहमद यांच्यासोबत ओरांगी गावात रहात असे. त्याच्या कराची भेटीत तो त्याच्या आत्तेबहिणीच्या प्रेमात पडल्याचे सांगण्यात आले.
त्याच्या दुसऱ्या भेटीच्या काळात त्याची आत्तेबहीण शाजेब हिने त्यांची ओळख आयएसआयचे हस्तक असलेल्या अशीम आणि अमद यांची करून दिली. त्यानंतर तो व्हॉट्स ऍप द्वारे काशी विश्वनाथ मंदिर, हवाई दल निवड मंडळ, दशाश्वरमेध घाट, ग्यानव्यापी मस्जिद, चांदौली आणि अमेठीतील केंद्रीय राखीव पोलिस दलाचे तळ, संकट मोचन मंदिर, दिल्लीतील इंडिया गेट, कांट रेल्वेस्थानक, नागपूर रेल्वे स्थानक, प्रयागराजमधील नैनी ब्रिज आणिअर्ध कुंभ मेळा, गोरखपूूर रेल्वे स्थानक, रेणूकूट वीज निर्मिती प्रकल्प, अजमेर शरीफ दर्गा यांची छायाचित्रे पाठवली.
लष्कराच्या हालचाली आणि तैनातीची माहिती त्याने कळवली आहे. भारतात सुरू असणारी आंदोलने आनि निदर्शनाची माहिती पाठवण्यास त्याला सांगण्यात आले होते. त्याबदल्यात त्याच्या आत्ते बहिणीशी लग्न लावून देण्यास मदत करण्याचे आश्वासन आयएसआयच्या एजंटनी दिले होते. त्याचे त्याच्या आयएसआय हॅंडलरशी शेवटचे संभाषण 13 जानेवार झाले होते. गंमतीचा भाग म्हणजे त्याची आत्या आणि काकांनी वारंवार सांगूनही तो हे कृत्य करतच होता. त्याच्यावर देशाविरूध्द युध्द केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.