-हिमांशू
आज बरोबर 73 वर्षे पूर्ण झाली. परकीयांच्या गुलामगिरीतून आपल्या मायभूमीची मुक्तता होतानाचा तो क्षण ज्यांनी प्रत्यक्ष अनुभवला, ते भाग्यवंत होत… सर्वच अर्थांनी! कारण या बुजुर्गांनी परदास्याची दाहकता अनुभवली आणि त्यामुळेच त्यांना स्वातंत्र्याचं मोल समजलं.
1992 मध्ये देशानं “खाउजा’ धोरण स्वीकारल्यानंतर जन्माला आलेले आता तरुण झाले आहेत. संपत्तीची प्रचंड प्रमाणात निर्मिती करण्याची ही प्रक्रिया सुरू झाली तेव्हा निर्माण झालेली संपत्ती अर्थशास्त्रातल्या झिरपा सिद्धांतानुसार समाजातल्या सर्व स्तरांपर्यंत पोहोचेल, हे अपेक्षित मानलं गेलं होतं. अर्थात, या प्रक्रियेच्या पूर्वी जे जाणत्या वयात होते, त्यांनाच हे आठवत असेल.
प्रत्यक्षात 28 वर्षांनंतर जी परिस्थिती दिसतेय, त्याविषयी त्यांच्या मनात अनेक प्रश्नही असतील. काही प्रश्न त्यांच्या ओठावर येत असतील तर अनेक प्रश्न गिळले जात असतील. कारण “पुढे जायचं’ याचा अर्थ “मागे वळून पाहायचं नाही’ असा होतो, हे त्या वेळेपर्यंत ठाऊकच नव्हतं आणि आता तोच एकमेव जीवनमार्ग झालेला असल्यामुळे मागे वळून पाहण्याची भीती वाटत असावी. उदारीकरणानंतरच्या गेल्या 28 वर्षांमध्ये जे मनामनात घडत राहिलं, तेच स्वातंत्र्याच्या बाबतीत गेल्या 73 वर्षांत घडलं असावं का? ज्यांना पारतंत्र्य ठाऊकच नाही, अशांना स्वातंत्र्याची खरी किंमत कळलीच नसावी का? की जसजशा पिढ्या बदलल्या, तसतसा दृष्टिकोन बदलत गेला असावा?
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर 73 वर्षांत काय कमावलं आणि काय गमावलं, याचा हिशेब दरवर्षीप्रमाणं यावर्षीही मांडला गेलाय; जातोय. देशानं एवढ्या वर्षांत प्रचंड प्रगती केली आणि अनेक बाबतीत विकसित देशांच्या रांगेत आपण जाऊन बसलो, हे अभिमानानं सांगावं असंच यश आहे. विशेषतः अंतरिक्ष संशोधनासारख्या क्षेत्रात आज जगाची नजर आपल्याकडे लागलेली आहे आणि उपग्रह प्रक्षेपणाची चक्क “बाजारपेठ’ आपण निर्माण आणि काबीज केली आहे. अशीच भरारी आपण अनेक क्षेत्रांमध्ये मारली आहे.
त्या साऱ्या यशाला उजाळा देतानाच अनेकजण प्रगतीला “मानवी चेहरा’ नसल्याचा सूरही लावत आहेत. यावर्षी असे सूर काहीसे वाढलेले दिसतात. कारण अगदी साधं-सरळ आहे. ज्या अर्थव्यवस्थांचा तोरा अनेक देश मिरवीत होते, त्या सर्व यावर्षी ठप्प पडल्या आहेत आणि आर्थिक घडामोडींच्या पलीकडेही जग आहे, यावर उदारीकरणानंतर 28 वर्षांनी पहिल्यांदाच विचार होतोय. आपल्या देशात तर “इंडिया’ आणि “भारत’ असे दोन स्वतंत्र देश तयार होत असल्याचा इशारा अनेकांनी अनेकदा दिला होता; पण या परिस्थितीचं प्रत्यक्ष दर्शन यावर्षीच जवळून घडलं. एकीकडे ऑनलाइन मौजमजा सुरू होती आणि दुसरीकडे भुकेनं व्याकूळ झालेले मजूर शेकडो मैल चालत होते.
कोविडमुळे जाहीर झालेला लॉकडाऊन हे एका मर्यादित वर्गासाठी “सेलिब्रेशन’ ठरलं आणि एका मोठ्या वर्गासाठी तो “जीवन-मरणाचा प्रश्न’ ठरला. 73 वर्षांचे राहूद्या; आपण केवळ 28 वर्षांचा आढावा प्रामाणिकपणे आणि राजकारणविरहित मेंदूनं घ्यायला हवाय… भौतिक नव्हे तर संवेदनात्मक स्वरूपात! काल एखादी गोष्ट पाहून आपल्याला जे वाटत होतं, ते आज वाटतं का? नसेल तर का नाही? या प्रश्नांची प्रामाणिक उत्तरं आपण स्वतःला देऊया! कदाचित स्वातंत्र्याचा खरा अर्थ सापडेल.