मेलबर्न – महिलांच्या टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत भरात असलेल्या भारतीय संघाचा सामना इंग्लंडशी आज (गुरूवारी, ९ वाजता) होत आहे. या स्पर्धेत भारतीय संघाने अ गटाच्या साखळीतील सर्व सामने जिंकत दिमाखात उपांत्य फेरी गाठली आहे.
अ गटातील प्रथम क्रमांकाचा संघ व ब गटातील दुसऱ्या क्रमांकाचा संघ यांच्यात पहिली उपांत्य लढत होणार आहे. ब गटातील नंबर गेममध्ये इंग्लंड व दक्षिण आफ्रिका यांच्यात लढत होणार होती. तसेच दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातही महत्त्वाचा सामना होणार होता. भारताचा सामना इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यापैकी एका संघाशी होण्याची शक्यता होती. दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाला व भारताला दक्षिण आफ्रिकेच्या रूपाने सोपा प्रतिस्पर्धी मिळाला.
हा सामना रद्द झाल्यामुळे दक्षिण आफ्रिकेला एक गुण मिळाला व ते 7 गुणांसह पहिल्या स्थानावर आले. इंग्लंड 6 गुणांसह दुसऱ्या स्थानावर राहिला. आता या गुणांच्या स्पर्धेत पहिला उपांत्य सामना भारत व इंग्लंड यांच्यात सिडनीला होईल. दुसरा उपांत्य सामना यजमान ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका यांच्यात गुरूवारीच होणार आहे. स्पर्धेची अंतिम लढत रविवारी मेलबर्न मैदानावर होईल. ऑस्ट्रेलियाने चार वेळा तर इंग्लंडने एकदा विजेतेपद पटकावले आहे. भारतीय संघाला अद्याप एकदाही अंतिम फेरी गाठता
आलेली नाही.