- इतर वाहनचालकांवर पोलीस करतात कारवाई
पिंपरी – गेल्या आठ दिवसांत वाहतूक पोलिसांनी साडेसह हजारांहून अधिक बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई केली. पोलिसांच्या या कारवाईचे सर्वसामान्य नागरिकांकडून कौतुक होत आहे. परंतु पोलीस बंदोबस्तात सुरू असलेल्या पुणे-मुंबई अवैध प्रवासी वाहतुकीला मात्र अभय मिळत असल्याची जोरदार चर्चा शहरात सुरू आहे.
पुणे-मुंबई दरम्यान वाहतूक करणारी अवैध प्रवासी वाहतूक वाकड आणि चिंचवड येथे सुरू आहे. या व्यवसायात सुमारे दोनशे वाहने आहेत. चिंचवड स्टेशन येथे तीन ठिकाणांवरून अवैध प्रवासी वाहतूक केली जाते. विशेष म्हणजे चिंचवड स्टेशन येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि वर्धमान चौक या दोन्ही ठिकाणी वाहतूक पोलीस असतात. प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी येथील एजंट मोठमोठ्याने “मुंबई मुंबई’ असे ओरडत असतात. मात्र, हप्तेखोरीमुळे हा आवाज कधीच पोलिसांना ऐकू जात नाही.
एका गाडीमागे सुमारे दोन हजार रुपयांचा हप्ता मिळत असल्याने दरमहा लाखो रुपयांचा मलिदा पोलिसांना मिळत असल्याने त्याकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष केले जाते. येथील तीन स्टॅण्डवर गाडी भरणारे दलाल एका प्रवाशामागे 50 रुपये घेतात. म्हणजेच दिवसाला 14 हजार रुपयांवरून अधिक रकमेचा मलिदा गाडी भरणाऱ्या दलाल आणि त्यांच्या भाईंना मिळतो. अशीच स्थिती वाकड येथील चौकात दिसून येते. दोन्ही ठिकाणी अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांवर जरब बसेल, अशी कारवाई होणे अपेक्षित आहे.
एसटी अधिकाऱ्यांना दमदाटी
अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या एजंटांनी थेट एसटी स्टॅण्डवर कब्जा मिळविला आहे. अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांकडून येथील एसटीच्या अधिकाऱ्याला दमदाटी केली जाते. तसेच तो अधिकारी आमच्याकडे हप्ता मागतो आहे, अशी खोटी तक्रार करण्यापर्यंत येथील एजंटाची मजल गेली आहे.