वॉशिंग्टन –जागतिक मनुष्यबळ विकास निर्देशांकांत भारत 174 देशाच्या यादीत 116 व्या क्रमांकावर आहे. त्यामुळे सरकारला या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात काम करावे लागणार आहे.
जागतिक बॅंकेने तयार केलेल्या या निर्देशांकांत भारताचे गेल्या वर्षी 0.44 गुण होते. ते आता 0.49 झाले असले तरी क्रमवारीत भारत अजूनही फार मागे आहे. नागरिकांचे आरोग्य आणि शिक्षणाच्या आधारावर हा निर्देशांक तयार केला जातो. यासाठीची आकडेवारी मार्च महिन्याअगोदर जमा केलेली आहे. त्यामुळे करोना व्हायरसचा विविध देशातील मनुष्यबळावर किती परिणाम झाला आहे याचे आकलन या अहवालातून होत नाही.
भारत या क्रमवारीत इतक्या खालच्या पातळीवर असल्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात येत आहे. जागतिक बॅंकेच्या मनुष्यबळ विकास विभागाच्या उपाध्यक्ष ममता मूर्ती यांनी सांगितले की, जागतिक बॅंकेने जगातील विविध देशांतील परिस्थितीचा अभ्यास करून हा अहवाल तयार केला आहे.
ज्यांना क्रमवारीत पुढे जाण्याची इच्छा आहे त्यांनी या अहवालाच्या आधारावर आपल्या योजना आणि कार्यक्रमात बदल करण्याची गरज आहे. विशेष म्हणजे करोना व्हायरसमुळे मुले आणि महिलांवर अधिक परिणाम झाला आहे. जवळजवळ 1 अब्ज मुले सध्या शाळेबाहेर आहेत. ही परिस्थिती सुधारण्याची गरज आहे. आगामी काळात जगातील विविध देशांना या क्षेत्रात अधिक काम करावे लागेल, असे त्यांनी सांगितले.
भारताची क्रमवारीला हरकत
गेल्या वर्षी या क्रमवारीत भारत 115 व्या क्रमांकावर होता. तो आता 116 व्या क्रमांकावर गेला आहे. गेल्या वर्षी भारताने ही क्रमवारी तयार करण्यासाठी वापरलेल्या निकषाबाबत हरकत घेतली होती. जागतिक बॅंकेने म्हटले आहे की, भारताने घेतलेल्या हरकतीचा विचार करून या वर्षी मूल्यांकन सुधारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र तरीही भारत या क्रमवारीत 1 अंकांनी घसरला आहे.