नवी दिल्ली – भारताला रोज 50 लाख पिंप इतके क्रूड लागते. भारताची वर्षाची तेल शुद्धीकरणाची क्षमता तब्बल 25 कोटी टनाची आहे. भारत हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा क्रूड आयात करणारा देश आहे. अशा परिस्थितीमध्ये भारताने आपली गरज भागविण्यासाठी रशियाकडून अल्प प्रमाणात क्रूड आयात केले तर त्याचे राजकारण करू नये असा आग्रह भारताने केला आहे.
भारताची लोकसंख्या मोठी आहे. या लोकसंख्येच्या ऊर्जेच्या गरजा भागविण्यासाठी भारताला लघू आणि दीर्घ पल्ल्यात क्रूड आयातीसाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्या लागतात. युद्धामुळे क्रुड तेलाचे दर वाढले आहेत. अशा परिस्थितीमध्ये भारतीय जनतेला किफायतशीर दरात क्रूड तेल उपलब्ध व्हावे यासाठी भारत सरकार प्रामाणिकपणे प्रयत्न करीत आहे.
याचाच एक भाग म्हणून रशियाकडून अल्प प्रमाणात क्रूड आयात केले जात असतानाच काही देश भारताच्या या आयातीवर टीका करीत आहेत. पाश्चिमात्य देशांनी रशियावर काही निर्बंध घातले असले तरी अजून रशियाच्या क्रूड निर्यातीवर निर्बंध घातलेले नाहीत. कारण युरोपातील अनेक देश भारतापेक्षा कितीतरी पटीने क्रूडची आयात रोज करीत आहेत. अशा परिस्थितीमध्ये भारताच्या आयातीला हरकत घेणे बरोबर नाही असे परराष्ट्र व्यवहार खात्याच्या प्रवक्त्याने सांगितले.
भारताने रशियाकडून केलेली क्रूड तेलाची आयात फार कमी आहे असे म्हटले असले तरी भारताने नेमकी किती आयात केली आहे हे स्पष्ट केलेले नाही. भारताची क्रूड तेलाची आयात मध्यपूर्वेतील देशाकडून जास्त होते. त्याचबरोबर भारताने अमेरिकेकडून गेल्या काही वर्षांमध्ये क्रूड तेलाची आयात मोठ्या प्रमाणात वाढविली आहे.
आता भारत आपल्या गरजेच्या तब्बल 7.3 टक्के क्रूड अमेरिकेतून घेतो. याचे मूल्य 13 अब्ज डॉलर इतके असल्याचे सांगण्यात आले. भारताच्या काही शेजारी देशांमध्ये इंधनाच्या किमती वाढल्यामुळे मोठे पेचप्रसंग निर्माण झाले आहेत. अशा प्रकारच्या पेचप्रसंग निर्माण होऊ नये यासाठी भारत सरकार प्रयत्न करीत आहे. मात्र यावर काही देश नकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त करीत असल्याबद्दल भारताकडून खेद व्यक्त करण्यात आला.