नवी दिल्ली – करोनानंतर आर्थिक परिस्थिती वेग घेण्याची शक्यता निर्माण झाली असतानाच सर्व समीकरणे बिघडू लागली आहेत. महागाई वाढत आहे. रुपयाचे मूल्य कोसळत आहे. त्याचबरोबर आता मार्च महिन्यातील औद्योगिक उत्पादन केवळ 1.9 टक्के दराने वाढले असल्याचे आकडेवारी केंद्र सरकारने जाहीर केली आहे.
मनुफॅक्चरिंग क्षेत्राची उत्पादकता वाढावी म्हणून गेल्या अनेक महिन्यापासून प्रयत्न केले जात असतानाच मार्च महिन्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राची उत्पादकता केवळ 0.9 टक्क्यानी वाढली आहे.
खान क्षेत्राची उत्पादकता चार टक्क्यांनी तर ऊर्जानिर्मिती 6.1 टक्क्यांनी वाढली आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्यामध्ये औद्योगिक उत्पादन 24.2 टक्क्यांनी वाढले होते. सरलेल्या पूर्ण वर्षात औद्योगिक उत्पादन 11.3 टक्क्यांनी वाढले आहे. गेल्या वर्षी करोनामुळे औद्योगिक उत्पादन 8.4 टक्क्यांनी कमी झाले होते.
मार्च 2020 पासून भारताचे औद्योगिक उत्पादन कमी होत आहे. ते वाढविण्यासाठी बरेच प्रयत्न केले जात आहेत. मात्र दरम्यानच्या काळामध्ये अनेक नकारात्मक घटना घडत असल्यामुळे औद्योगीक उत्पादनात नजीकच्या भविष्यात वाढ होण्याची शक्यता कमी झाली आहे. औद्योगिक उत्पादन कमी झाल्यामुळे त्याचा संपूर्ण वर्षाच्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीवर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता दिसून येत आहे.