नवी दिल्ली – तुर्कस्थानचा ताजा भूकंप असो की रशिया-युक्रेन युद्धात अडकलेल्या भारतासह 18 देशांच्या नागरिकांना मायदेशी आणण्याचा प्रसंग असो, भारताने अशावेळी मोलाची भूमिका बजावली. करोनाचा वाईट असो की अफगाणिस्तानच्या संकटात अडकलेल्या सर्व भारतीयांना मायदेशी आणण्याचा प्रसंग असो, प्रत्येक वेळी भारताने स्वत:च्या तसेच अन्य देशांच्या नागरिकांनाही मदत केली असल्याने, संकटात असलेले देश आपत्तीच्या प्रसंगी भारताकडेच आशेने बघतात, असे प्रतिपादन केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी केले.
“ऑपरेशन गंगा (डायरी ऑफ अ पब्लिक सर्व्हंट)’ या पुस्तकाचे ठाकूर यांनी त्यांच्या निवासस्थानी प्रकाशन केले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताच्या वाढत्या जागतिक क्षमतांबद्दल सांगितले आणि आज आपण जगाची मदत घेत नाही, तर इतर देश संकटात आपल्याकडे पाहत असल्याचे सांगितले.
ठाकूर म्हणाले, युक्रेनमध्ये अडकलेल्या 18 देशांतील 147 नागरिकांचीही आम्ही सुटका केली. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या मंत्रिमंडळातील चार मंत्र्यांना विशेष दूत म्हणून रशिया-युक्रेनच्या सीमेला लागून असलेल्या देशांच्या सीमेवर पाठवले. पोलंड, स्लोव्हाकिया, रोमानिया, मोल्दोव्हा, हंगेरी सारख्या देशांमध्ये, आमच्या मंत्र्यांनी विद्यार्थ्यांसाठी निवास व्यवस्था करण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांशी समन्वय साधला. आमची सर्व मुले सुखरूप परत येईपर्यंत आमचे मंत्री तिथेच थांबले. ठाकूर यांनी ऑपरेशन गंगामध्ये भारतीय हवाई दलाने केलेल्या 13 विशेष ऑपरेशन्सचाही उल्लेख केला.
दरम्यान, नेटफ्लिक्सचे संस्थापक अध्यक्ष टेड सारंडोस यांनी दिल्लीत ठाकूर यांची भेट घेतली. सारंडोस यांच्याशी संभाषण करताना, ठाकूर यांनी वाढत्या सर्जनशील अर्थव्यवस्थेवर प्रकाश टाकला आणि भारत पोस्ट प्रॉडक्शन हब म्हणून कसा उदयास आला आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.