आगरतळा – त्रिपुरामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी 87.63 टक्के मतदान झाले. मागील वेळेपेक्षा ते कमी ठरले आहे. मागील वेळी 89.38 टक्के इतक्या मतदानाची नोंद झाली होती. त्या राज्यात सर्वांधिक 93 टक्के मतदान 2013 मध्ये नोंदले गेले. त्रिपुरात गुरूवारी मतदान झाले. त्या मतदानाची अंतिम आकडेवारी निवडणूक आयोगाने शुक्रवारी जाहीर केली.
त्रिपुरात विधानसभेच्या एकूण 60 जागा आहेत. यावेळच्या निवडणुकीमुळे 259 उमेदवारांचे भवितव्य इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये (ईव्हीएम) बंद झाले. यावेळी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी 28 लाख 14 हजार मतदार पात्र होते. त्यातील सुमारे 24 लाख 66 हजार मतदारांनी हक्क बजावला. त्रिपुरात यावेळी भाजप, माकप-कॉंग्रेस आघाडी आणि तिप्रा मोथा अशी तिरंगी लढत अपेक्षित आहे.