मोहाली – रविंद्र जडेजाची अष्टपैलू खेळी व त्याला रवीचंद्रन अश्विनने दिलेली तोलामोलाची साथ यांच्या जोरावर यजमान भारतीय संघाने श्रीलंकेचा पहिल्या कसोटी सामन्यात तिसऱ्याच दिवशी रविवारी एक डाव आणि 222 धावांनी दणदणीत पराभव केला. या विजयासह भारतीय संघाने या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी भक्कम आघाडी घेतली. या सामन्यात दीडशतकी खेळी व दोन्ही डावांत मिळून 9 गडी बाद करणारा जडेजा सामन्याचा मानकरी ठरला. भारतीय संघाचे नेतृत्व करताना रोहित शर्माने याच कसोटीत शानदार विजय मिळवत आपल्या नव्या कारकिर्दीचा थाटात शुभारंभ केला.
– भारताचा एक डाव आणि 222 धावांनी विजय
– कर्णधार म्हणून रोहितचा पहिलाच कसोटी विजय
– अश्विन व जडेजाची विक्रमी कामगिरी
– रवींद्र जडेजा ठरला सामनावीर
– कोहलीच्या शतकी कसोटीला विजयाची भेट
– फॉलोऑनच्या नामुष्कीनंतरही श्रीलंकेकडून निराशा
– पाच दिवसांचा सामना तिसऱ्याच दिवशी संपला
– दुसरी कसोटी 12 ते 16 मार्चदरम्यान बेंगळुरूत
– हा सामना होणार प्रकाशझोतात
या पहिल्या कसोटीत भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी घेतली. संघातील प्रमुख फलंदाजांच्या उपयुक्त खेळीनंतर खरेतर जडेजानेच हा सामना गाजवला. त्याने 175 धावांची खेळी करताना रवीचंद्रन अश्विनसह संघाला मोटी धावसंख्या उभारून दिली. भारताने आपला पहिला डाव 8 बाद 574 धावांवर घोषित केला.
भारताच्या धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा पहिला डाव जडेजा, अश्विन, जसप्रीत बुमराह व महंमद शमी यांच्या गोलंदाजीसमोर अवघ्या 174 धावांवर संपुष्टात आला व त्यांना फॉलोऑनच्या नामुष्कीचा सामना करावा लागला. या डावात त्यांच्या पाथुम निसांकाने 61 धावांची खेळी केली. मात्र, त्यांच्या अन्य फलंदाजांनी निराशा केली. भारताकडून जडेजाने 5 गडी बाद केले. त्याला साथ देताना अश्विन व बुमराह यांनी प्रत्येकी 2, तर शमीने 1 गडी बाद केला.
फॉलोऑननंतर आपला दुसरा डाव सुरू केल्यावरही श्रीलंकेच्या फलंदाजांना भारताच्या गोलंदाजीचा सामना करता आला नाही. त्यांचा यष्टीरक्षक फलंदाज निरोशन डीकवेलाने अर्धशतकी खेळी करत पराभव लांबवला. मात्र, प्रमुख फलंदाजांनी निराशा केल्याने त्यांचा दुसरा डाव 60 षटकांत 178 धावांवर संपला व भारतीय संघाने एक डाव आणि 222 धावांनी मोठा विजय नोंदवला.
धनंजय डीसील्व्हा 30, अँजेलो मॅथ्युज 28, दिमुथ करुणारत्ने 27, चरिथा असालंका 20 यांनी स्थिरावण्याचा प्रयत्न केला. मात्र, अश्विन व जडेजा यांच्या फिरकी गोलंदाजीसमोर त्यांचा निभाव लागला नाही. भारताकडून अश्विन व जडेजा यांनी प्रत्येकी 4 गडी बाद केले. शमीने 2 बळी घेतले.
संक्षिप्त धावफलक – भारत पहिला डाव – 8 बाद 574 धावा घोषित. श्रीलंका पहिला डाव – 65 षटकांत सर्वबाद 174 धावा. (चरिथा असालंका 29, दिमुथ करुणारत्ने 28, अँजेलो मॅथ्युज 22, पाथुम निसांका नाबाद 61, रविंद्र जडेजा 5-41, जसप्रीत बुमराह 2-36, रवीचंद्रन अश्विन 2-49, महंमद शमी 1-27). श्रीलंका दुसरा डाव – 60 षटकांत सर्वबाद 178 धावा. (धनंजय डीसील्व्हा 30, अँजेलो मॅथ्युज 28, दिमुथ करुणारत्ने 27, चरिथा असालंका 20, निरोशन डीकवेला नाबाद 51, रवींद्र जडेजा 4-46, रवीचंद्रन अश्विन 4-47, महंमद शमी 2-48).