सोरतापवाडी- रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये भारतातील हजारो विद्यार्थी अडकले आहेत. त्यांना भारतात आणण्यासाठी प्रशासन शर्थीचे प्रयत्न करीत आहे. दरम्यान हवेली तालुक्यातील पेठ गावची कन्या वैष्णवी संदीप गुळुंकर ही देखील युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी गेली होती.
शनिवारी (दि. 5) ती सुखरूप घरी आली आहे. दरम्यान पेठ गावचे सरपंच सुरज चौधरी व हवेली तालुका पोलीस पाटील संघाचे उपाध्यक्ष दत्तात्रय चौधरी यांनी त्यांच्या घरी जाऊन वैष्णवीचे कौतुक करून सत्कार केला.
यावेळी वैष्णवीचे आई, वडील, आजी, भाऊ, चुलते सुनील गुंळुजकर, सचिन सुंबे आदी उपस्थित होते.
यावेळी वैष्णवीने तेथील परिस्थितीची माहिती दिली. युनिव्हर्सिटी पासून बसने सीमेवर येताना आठ किलोमीटर पायी जाऊन सीमेजवळ पोहोचलो. प्रचंड बर्फ पडत होता.
थंडी पण खूप होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना खूपच त्रास झाला. सीमेवर चार तास विद्यार्थी उभे होते. मध्येच युक्रेनचे पोलीस गोळीबार करून विद्यार्थ्यांना घाबरवत होते. अंगावर चिखल फेकत होते. दोन दिवस सीमेवर होतो. भारतातील राजदूत यांची अजिबातच मदत झाली नाही. तेथील लोकांनी विद्यार्थ्यांना खूप मदत केली.
खाण्यापिण्यासाठी दिले. आता आम्ही सुखरूप भारतात आलो आहोत, पण अजून तिथे अडकलेल्या विद्यार्थ्यांना सरकारने मदत करून लवकरात लवकर आपल्या मायदेशात आणले पाहिजे. कारण तिथे प्रचंड खाण्यापिण्याचे हाल चालले असून खाण्या पिण्यावाचून एक विद्यार्थ्यांचे नुकतेच निधन झाले. सरकारने फक्त सीमा पास करुन द्यावे, विद्यार्थी स्वतःचे पैसे खर्च करून भारतात येतील असे वैष्णवीनी सांगितले.
वैष्णवीला मायदेशात परत आणण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार रोहित पवार यांनी खूप मोलाची मदत केल्याचे संदीप गुंजकर यांनी सांगितले.