वडापुरी – जुलै महिना सुरू झाला तरी अद्यापही इंदापुरात पुरेसा पाऊस झालेला नाही. राज्यात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली असली तरी ग्रामीण भाग अजूनही तहानलेलाच आहे. पेरणीसाठी पुरेशा पावसाची अजूनही शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे.
इंदापूर तालुक्यात शेतकऱ्यांनी यावर्षी समाधानकारक पाऊस पडेल या आशेवरती शेतातील सर्व कामे उरकून ठेवली. मात्र, जुलै महिन्याचे पंधरा दिवस उलटले तरी पावसाने दडी मारल्यामुळे खरीप हंगामातील पेरण्या रखडल्याने तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे.
इंदापूर तालुक्यातील काही परिसरातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामाच्या पेरण्या केल्या आहेत तर काही ठिकाणी फक्त शेतातील कामे उरकून ठेवले आहेत, त्यामुळे इंदापूर तालुक्यातील शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत आहे. जर पावसाने ओढ दिली तर खरिपाच्या पेरण्या लांबणीवर पडणार असल्याचे चित्र इंदापूर तालुक्यात आहे.
केवळ 12 टक्केच पेरण्या
इंदापूर तालुक्यात सरासरी 9700 हेक्टर खरिपाचे क्षेत्र आहे. यापैकी फक्त 1169 हेक्टर वरतीच फक्त मकाच्या पेरण्या झाल्या आहेत. इंदापूर तालुक्यात 14 जुलैपर्यंत फक्त 12 टक्केच पेरण्या खरीप हंगामातील झाले असल्याचे तालुक्यातील चित्र आहे.
जर पाऊस पडला नाही तर पेरण्या झालेल्या पिकांना जगवणे सुद्धा कठीण होईल. ऊस लागवडीसाठी सरी काढून तयार आहे; परंतु पाऊसपाणी समाधानकारक नसल्याने ऊस लागवड लांबणीवर जाण्याची शक्यता आहे.
– भागवत शिंदे, ऊस उत्पादक शेतकरी, भाटनिमगाव