नगर – ऐन उन्हाळ्यात शहरातील तीव्र पाणीटंचाईमुळे नागरिकांचा संताप होत आहे. कल्याण रोड परिसरात अनेक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. परंतु, पुरेसे टँकर नसल्याने नागरिकांना तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे.
पाणीटंचाईमुळे येथील महिलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत असल्याने परिसरातील नागरिक संतप्त झाले आहेत. फेज टू, फेज 1 व अमृत या तीन सुधारित पाणी योजनांवर आतापर्यंत सुमारे अडीचशे कोटी रुपये खर्च करण्यात आले. महत्त्वाकांक्षी ‘अमृत’ पाणी योजनेचे काम देखील पूर्ण झाले आहे. असे असतानाही शहरातील अनेक भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
त्यात कल्याण रोड परिसरातील नवीन वसाहतींना तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. इंगळे मळा, गायके मळा, डागवाले मळा, लेंडकर मळा, जगताप मळा, लोंढे मळा, उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंचा परिसर, रेल्वे लाईन परिसर, लिंक रोड परिसर आदी भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. महापालिकेने या भागात टँकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे. परंतु तो पुरेशा प्रमाणात नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. या भागात सध्या दोन टँकर सुरू आहेत, परंतु ते पुरेसे नाहीत. या टँकरसाठी देखील नागरिकांना तीन-चार दिवस प्रतिक्षा करावी लागत आहे. ऐन उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत.
जलवाहिन्या अजूनही सुरु नाही
शहरात मागील 13 वर्षांपासून हाती घेण्यात आलेल्या फेज टू योजनेच्या काही अंतर्गत जलवाहिन्या अद्यापही कोरड्याच आहे. त्या जलवाहिन्यांमधून पाणी सोडण्याचे नियोजन नसल्याने शहरात वारंवार पाणीटंचाई निर्माण होत आहे.
वितरणाचे नियोजन ढासळले
लालटाकी, सावेडी उपनगर, कल्याण रोड, बुरूडगाव, सारसनगर, कोठला, आरटीओ, तसेच केडगाव उपनगर आदी भागात पाण्याच्या 35 टाक्या आहेत. परंतु या टाक्यांमधून पाणी सोडण्याचे नियोजन ढासळले आहे. काही टाक्यांपर्यंत, तर अद्याप पाणीच पोहोचले नाही. वसंत टेकडी येथे पाणी आल्यानंतर शहरातील टाक्या पाण्याने भरल्या जातात. मात्र, त्यानंतरचे पाणी वितरणाचे नियोजन नसल्याने शहरात महिन्यातून किमान दोन वेळा, तरी कृत्रिम पाणीटंचाई निर्माण होते.
योजनांवरील खर्च
फेज 1 – 44 कोटी
फेज टू – 116 कोटी
अमृत – 140 कोटी
नळजोड – 62 हजार
एकूण टाक्या – 35
==================